वाहतुकीचा बोजवारा

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, पालघर, कोकण तसेच पुणे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी खंडाळ्याच्या घाटात रस्ते व रेल्वेमार्गावर दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे दरम्यानची रस्ते व रेल्वे वाहतूक ठप्प झाली. राज्यभरात सोमवारी दिवसभरात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये १३ ठार तर ४ जण जखमी झाले. ८ जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबईत महिन्याभराचा सरासरी पाऊस केवळ चार दिवसांत झाला आहे. मुंबई, ठाणे व पालघरमधील शाळांना मंगळवारीही सुटी जाहीर करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. जिल्ह्यातील वैतरणा, तानसा, सूर्या, देहेरजा, पिंजाळ या नद्यांना पूर आला असून तामसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे कर्जत-लोणावळा रेल्वे घाट विभागात ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान भूस्खलन झाले. त्यामुळे मध्य रेल्वेने १७ रेल्वेगाड्या बंद केल्या. ३१ रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. तसेच अनेक रेल्वेगाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या. मुसळधार पावसाचा फटका राज्य परिवहन महामंडळालाही बसला. गत दोन दिवसांत राज्यभरातील ७८२० एसटी फे-या रद्द कराव्या लागल्या.

त्यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे २.३० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सोमवारी पहाटे दरड कोसळली. मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद होती. सुमारे ७१८० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या मिसिंग लिंकवर सोमवारी दरड कोसळली. यात बोगद्याच्या कमानीचा काही भाग ढासळला. त्यामुळे दोन महिन्यांतच तो वाहतुकीसाठी बंद करण्याची नामुष्की ओढवली. या दुर्घटनेनंतर प्रकल्पाच्या सुरक्षेसह कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या मार्गिकेवरून रोज हजारो वाहने धावणार असल्याने अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे कोकणाशी संपर्क मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला असून हजारो प्रवासी आणि शेकडो मालवाहू वाहने अडकून पडली आहेत. दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे विधानसभा आणि परिषदेत सोमवारी कोणतेही कामकाज न होता दोन्ही सभागृहे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली. अधिवेशनाकरिता मुंबईला येण्यासाठी निघालेल्या आमदारांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला. अनेक आमदार अर्ध्या रस्त्यावरून माघारी परतले. तर काहींना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक या भागात ढगफुटीसारख्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. मंगळवारी नाशिक शहरासह पाच तालुक्यांतील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. ढगफुटी होण्याची दाट शक्यता असल्याने एकाच दिवसात सुमारे ३०० मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आळंदीत सोमवार सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. नंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी रिमझिम पाऊस सुरूच आहे. सततच्या पावसामुळे इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून मंदिर परिसरातही पाणी साचले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या बुधवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार असल्याने आळंदीत हजारो वारकरी दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारंवार आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत इंद्रायणी नदीच्या पात्राजवळ किंवा घाट परिसरात जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि दृश्यमानतेत झालेली मोठी घट यामुळे सोमवारी विमानसेवा विस्कळीत झाली. दुपारी ३.३० वाजेपर्यंत येणारी किमान पाच विमाने मुंबईत उतरू न शकल्याने त्यांना इतर विमानतळांवर वळवण्यात आले. राज्यात कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी २४ तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील बोगद्यात स्लॅबचा काही भाग कोसळल्याची आणि पाणी झिरपत असल्याची दृश्ये समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. या घटनेमागील नेमके कारण तांत्रिक तपासणीनंतरच स्पष्ट होईल. मात्र, या घटनेने विकासकामे आणि निसर्ग यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिसिंग लिंकसारखे प्रकल्प वाहतुकीचा वेळ कमी करणे, अपघातांचे प्रमाण घटविणे आणि आर्थिक प्रगतीला चालना देणे यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. परंतु हे प्रकल्प सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जात असल्याने तेथील भौगोलिक रचना, मुसळधार पाऊस, जलप्रवाह आणि जैवविविधता यांचा सखोल विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे. विकासकामे पूर्ण झाली म्हणजे जबाबदारी संपत नाही.

त्यानंतरही नियमित तपासणी, देखभाल, स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण आणि आवश्यक तेथे त्वरित दुरुस्तीही तितकीच महत्त्वाची असते. आज हवामान बदलामुळे अतिवृष्टीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत विकास प्रकल्पांची रचना करताना भविष्यातील नैसर्गिक आव्हानांचा विचार करणे ही काळाची गरज आहे. अन्यथा आर्थिक नुकसानीबरोबरच मानवी जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. आपले निसर्गाचे ऋतुचक्र आता वेगाने बदलत चालले आहे आणि त्याला विविध कारणांनी मानवच जबाबदार आहे. तथाकथित विकासानिमित्त मानवाने बेसुमार वृक्षतोड करून झाडांची हत्या चालवली आहे. विहिरी, तलाव बुजवून टाकले आहेत तसेच नद्या, नाले आणि ओढे यांचे नैसर्गिक मार्ग बदलून टाकले आहेत. गावागावांत रस्ते, हायवे आणि एक्सप्रेस हायवे यांची गरज नसताना जाळे विणले जात आहे आणि त्या नावाखाली आजूबाजूच्या निसर्गाचे वस्त्रहरण सुरू आहे. लोकांच्या सुपीक शेती आणि बागा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. त्याचेच पातक म्हणून आज जागतिक तापमान वाढून ऋतुचक्र बदलत आहे. आता तरी मानवाने वेळीच जागे होणे गरजेचे आहे. या संकटावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात देशी वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news