मुंबई : गेल्या पाच दिवसांत केंद्र सरकारने दोन वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. १५ मे रोजी देशात पेट्रोलच्या दरात ३ रुपयांनी आणि डिझेलच्या दरात ३.११ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (ता. १९ मे) पुन्हा एकदा देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ करण्यात आली.
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असतानाच दुसरीकडे मात्र, राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप किंवा डिझेल पंपावर इंधन नसल्याकारणाने नागरिक रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे. तर जळगावमधील एरंडोल तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल नसल्याकारणामुळे पंपावर काम करणा-यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे इंधन नसल्याकारणामुळे नागरिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. राज्यात इंधन नसल्याकारणामुळे घडणा-या विविध घटनांमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘‘जळगावमध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणा-या एका कर्मचा-याच्या पोटात चाकू खुपसला. बुलडाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोक १२ तास लाईनमध्ये उभे राहिले, अकोल्याच्या वाशिम नाका येथे पेट्रोल-डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूरमध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाहीू चाललंय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिनमधील तेल पण संपले का?’’ असे लिहित संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे याबाबत शासन किंवा सरकारमधील नेतेमंडळी नेमके काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
















