लातूर : प्रतिनिधी
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८८ व्या स्थापना दिनानिमित्त २७ जुलै रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर येथील नवआरक्षी प्रशिक्षण केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्राची एकता, अखंडता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणा-या सीआरपीएफच्या अमर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी, जवान, नवप्रविष्ठ आरक्षी तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस उपमहानिरीक्षक तथा आरटीसीचे प्राचार्य अमीरुल हसन अन्सारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सीआरपीएफच्या गौरवशाली परंपरा, अदम्य शौर्य, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवेप्रती असलेल्या अखंड बांधिलकीचा गौरव केला. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दलाने दिलेल्या उल्लेखनीय योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला.
केंद्रीय राखीव पोलीस बल हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे प्रमुख बल असून दहशतवादविरोधी कारवाया, नक्षलविरोधी मोहिमा, शांततापूर्ण निवडणूक पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत व बचाव कार्यात नेहमीच तत्परतेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले आहे, असे त्यांनी सांगितले. स्थापना दिनाचे औचित्य साधून अधिकारी व जवानांमध्ये संघभावना, परस्पर समन्वय आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सर्व खेळाडूंनी उत्साहाने सहभाग नोंदवून उत्कृष्ट क्रीडाभावना, शिस्त आणि संघभावनेचे दर्शन घडवले. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना यावेळी गौरविण्यात आले.
















