शेतकरी कर्जमाफी, पुणे विषारी दारुकांड, दुष्काळ, स्मार्ट मीटर मुद्यावरून अधिवेशन वादळी ठरणार
मुंबई : प्रतिनिधी
ऑपरेशन टायगरमुळे तापलेल्या राजकीय वातावरणात सोमवारी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. पावसाने दडी मारल्याने राज्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, तीव्र पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी, पुण्यातील विषारी दारूने घेतलेले बळी, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाला होत असलेला विरोध आदी विषयावर सरकारला घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून, पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेना ठाकरे गटातील खासदार फुटीचे पडसाद अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर करून ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी पक्षाची साथ सोडल्याने उबाठासह विरोधी बाकावर अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता दूर सारून अधिवेशनात एकजुटीने सत्ताधारी पक्षाशी दोन हात करण्याचे आव्हान विरोधकांसमोर आहे. जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर सरकारला घेरण्याची तयारी करण्यासाठी विरोधी पक्षाची आज रविवारी बैठक होत आहे. या बैठकीत महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक राहण्याचा आणि चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्यातील शेतक-यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. मात्र, या योजनेतील अटी शर्ती जाचक असल्याची टीका होत असून विरोधी पक्षाने सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अलीकडेच पंढरपूर येथे आंदोलन केले तर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आंदोलन छेडले आहे. त्यामुळे विरोधकांकडून सरसकट शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यावर पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या चिंतेचे ढग आहेत. जूनचा चौथा आठवडा उजाडला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंताक्रांत आहे. याशिवाय राज्याच्या अनेक भागात पाणी टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. संभाव्य दुष्काळी स्थिती आणि पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून अधिवेशनात लावून धरली जाण्याची शक्यता आहे.
















