सोलापूर : उन्हाळा म्हणजे लग्नसराई. त्यामुळे बाजारात मोगऱ्याच्या गजऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्यामुळे गजऱ्यांची किंमत देखील चांगलीच वाढली आहे.
मोगऱ्यांची फुले वर्षभर उपलब्ध असतात परंतु उन्हाळ्यात त्याची उपलब्धता जास्त असते. यामुळे मोगऱ्याच्या गजऱ्यांची किंमत कमी जास्त होत असते. लग्नसराईमध्ये महिलांना सर्वांत प्रिय वस्तू म्हणजे मोगऱ्याचा गजरा, परंतु यंदा फुलांची आवक कमी झाली.
गजरा हे स्त्रीचे सौभाग्याचे लेणे म्हटले जाते. गजऱ्याशिवाय साजशृंगार पूर्ण होत नाही असेही म्हटले जाते. त्यामुळे महिलांना सण वार असो किंवा शुभकार्य यावेळी गजरा असावा असे वाटणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे आठ दिवसांपासून फुलांचे नुकसान होत आहे
यामुळे मोगरा सहाशे ते सातशे रुपये किलो झाला आहे. त्यामुळे व्यापारी एक गजरा वीस ते तीस रुपयांना विकत आहेत.बारा महिने मोगऱ्याच्या गजर्याची मागणी असते. परंतु उन्हाळ्यात लग्नसराई असल्याने मोगऱ्याच्या गजर्यांना मागणी जास्त प्रमाणात वाढली आहे. मोगऱ्याची फुले हे मंद्रूप, मंगळवेढा, टाकळी, येडगाव, येथून येतात.