पुणे : (प्रतिनिधी)
शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे ६ खासदार दाखल होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरीही दिली. मंगळवारी रात्रीच ही प्रक्रिया पार पडली. आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केला. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ऑपरेशन बाजार’ म्हणावे लागेल आणि हा ऑपरेशन बाजार लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील.
एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली. काल चार्टर विमानाने या खासदारांना दिल्लीत नेण्यात आले. राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आल्याचे बघायला मिळत आहे.
रोहित पवार यांनी म्हटले की, लग्न एकासोबत करायचे आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचे हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे हे लक्षण आहे. एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी..? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिले तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणा-यांना आणि पळवून नेणा-यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.
आज डोक्यावर दुष्काळाचे सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
















