भिवंडी : भिवंडीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री एक चार मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, ४ ते ५ जण अद्याप ढिगा-याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत यंत्रणा पोहोचण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेली एक चाळ जेसीबीच्या साहाय्याने तोडून बचाव पथकाने आत प्रवेश मिळवला.
भिवंडीतील इमारत दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दु:ख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंर्त्यांनी व्यक्त केली.
गिरीश महाजनांकडून घटनास्थळाचा आढावा
भिवंडीतील इमारत कोसळल्याच्या भीषण दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. या इमारतीबाबत प्रशासनाने आधीच धोकादायक असल्याची पूर्वकल्पना देत दोन वेळा नोटीस बजावली होती आणि येथील सर्व ३० कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते; मात्र, दुर्दैवाने काही जण पुन्हा आत गेल्याने त्यांच्यावर काळाने घाला घातला, अशी माहिती महाजन यांनी दिली.
अद्यापही ढिगा-याखाली एनडीआरएफकडून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू असून, दुर्घटनेमुळे शेजारील दुसरी इमारतही खचल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने तीदेखील तातडीने रिकामी केली आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना शासनाकडून लवकरच मदत दिली जाईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे.
















