नवी दिल्ली : नीट पेपरफुटीच्या मुद्यावरून भाजप खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत विरोधकांना सुनावले. या मुद्यावर ते इतके दिवस शांत का होते त्याचाही खुलासा त्यांनी केला. याआधी मी विरोधी पक्षात होतो तेव्हा माझे काम प्रश्न विचारणे होते आणि मी ते प्रामाणिकपणे केले. आता मी सत्ताधारी बाकांवर आहे. त्यामुळे माझी भूमिका बदलली. माझी जबाबदारी आता फक्त प्रश्न विचारण्याची नव्हे तर तोडगा काढण्याचीही आहे असे खासदार राघव चड्ढा यांनी म्हटले.
सभागृहात राघव चड्ढा यांनी पेपरफुटीवरून विद्यार्थ्यांना होणा-या त्रासावर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले की, मी काही काळ उअ चा विद्यार्थी होतो आणि मला विद्यार्थ्यांचा त्रास माहिती आहे. मी स्वत:ला एक वचन दिले होते, या मुद्द्यावर मी संसदेत तेव्हाच बोलेन जेव्हा यावर काही तोडगा निघेल आणि सिस्टम सुधारेल. आज तो ऐतिहासिक दिवस आहे जेव्हा सिस्टम सुधारली आहे. पेपरफुटी हा असा आजार आहे. ज्याच्यावर कायमस्वरुपी उपचार हवेत. याचा उपचार मीडियातील बाइटने झाला नसता तर संस्थात्मक तोडगा काढायला हवा होता. जो आज आमच्या सरकारने परीक्षा सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून आणला आहे असे त्यांनी म्हटले. तसेच विद्यार्थ्यांचा राग समजू शकतो. त्यांची परीक्षेबाबत तक्रारही योग्य आहे. तुमची मते महत्त्वाची आहेत. जेव्हा तुम्ही चिंता व्यक्त केली, तुमच्या वेदना मांडल्या तेव्हा पंतप्रधानांनी त्यावर एक पंतप्रधान म्हणून नव्हे तर एका पालकाप्रमाणे ते ऐकले.
विद्यार्थ्यांच्या मागणीवर सरकारची कारवाई
विद्यार्थ्यांच्या मागणीवर सरकारने कारवाई केली. आज ऐतिहासिक निर्णय घेतले गेलेत. त्यातून व्यवस्था बदलत आहे. जेव्हा एक विद्यार्थी परीक्षेची तयारी करतो तेव्हा तो एकटा तयारी करत नसतो. त्याचे संपूर्ण कुटुंब त्याची तयारी करते. १८-१८ तास विद्यार्थी अभ्यास करतात. रात्री २ पर्यंत वाचन करतात. पहाटे ५ वाजता पुन्हा उठतात. सोशल लाईफपासून ते दूर होतात. ज्या परीक्षेची तो तयारी करत असतो तो लीक झाल्यावर विद्यार्थ्यांची मेहनत, विश्वास आणि स्वप्न सर्व लीक होते. त्याला मानसिक त्रासातून जावे लागते असे सांगत खासदार राघव चड्ढा यांनी विद्यार्थ्यांचे दु:ख सभागृहात मांडले.
















