मुंबई : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता महाराष्ट्रातील केळी उत्पादक शेतक-यांना बसताना दिसत आहे. जेएनपीए बंदरातून इराणकडे पाठवलेले जवळपास ८०० ते १ हजार केळीचे कंटेनर तिथेच अडकून पडले असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी युद्धाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेणा-या शिपिंग कंपन्यांच्या मनमानीमुळे शेतकरी आणि निर्यातदार देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गल्फ देशांकडे जाणारे १२०० ते १५०० कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले होते. सुमारे १५ दिवसांनी यातील काही कंटेनर इराणकडे पाठवण्यात आले, तर काही स्थानिक बाजारात विक्रीसाठी वळवण्यात आले. इराणमध्ये कंटेनर पोहोचल्यानंतर शिपिंग कंपन्यांनी युद्धाचा आधार घेत भाड्यात मोठी वाढ केली. आधी २ ते ३ लाख रुपये असलेले भाडे थेट १५ लाख रुपयांपर्यंत नेण्यात आलं. या वाढलेल्या खर्चामुळे निर्यातदार आणि शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
इराणमध्ये माल अडकला
इराणमध्ये पोहोचलेले जवळपास १ हजार कंटेनर शिपिंग कंपन्यांनी अडवून ठेवल्याने केळी खराब होऊ लागली आहेत. एकीकडे वाढलेले भाडे आणि दुसरीकडे खराब होणारा माल, यामुळे शेतक-यांचे दुहेरी नुकसान होत आहे.
शेतक-यांचा आक्रोश
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोलापूरमधील ५० ते ६० शेतक-यांनी शिपिंग कंपन्यांमध्ये धडक देत जाब विचारला. मात्र काही कंपन्यांनी पोलिसांना बोलावून शेतक-यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
हिंगोलीतील शेतकरी संकटात
युद्धाचा परिणाम हिंगोली जिल्ह्यातील केळी निर्यातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील केळीची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. निर्यात बंद झाल्यामुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या केळीला फक्त ३०० ते ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नाही.
इतर पिकांनाही फटका
धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतक-यांनाही या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. निर्यात बंद झाल्यामुळे कलिंगडाला अवघा सव्वा रुपये किलो दर मिळत असल्याचं चित्र आहे.
















