देवास : लग्नाचा थाटमाट, अंगावर भरजरी शेरवानी, गळ्यात झेंडूच्या फुलांचे हार आणि हातात मिठाईचे डब्बे घेऊन तब्बल ४२ नवरदेव मोठ्या उत्साहाने विवाहस्थळी पोहोचले. लग्नबंधनात अडकण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन आलेल्या या तरुणांना काही वेळातच एका अशा धक्कादायक सत्याचा सामना करावा लागला, ज्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे एकही नवरी आलीच नव्हती! ‘अनाथाश्रमातील मुलींशी लग्न लावून देऊ’ असे आमिष दाखवून या सर्व तरुणांची एका मोठ्या टोळीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील देवासमध्ये समोर आला आहे.
हा केवळ आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नसून ग्रामीण भागातून आलेल्या डझनभर तरुण आणि त्यांच्या कुटुंबीयांचा झालेला मोठा मानसिक छळ आहे. इंदूरमधील एका नामांकित अनाथाश्रमाचे नाव वापरून या तरुणांना सामूहिक विवाहाचे आमिष दाखवण्यात आले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत विवाहस्थळावरील आनंदाचे वातावरण संताप आणि निराशेमध्ये बदलले. आम्हाला इंदूरच्या ‘मातृ छाया आश्रमा’तील मुलींचे फोटो दाखवण्यात आले होते. प्रत्यक्षात ते फोटो सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेले मॉडेल्सचे होते.
आम्हाला आदल्या दिवशीच देवासला पोहोचायला सांगितले होते आणि हुंडा म्हणून संसारोपयोगी साहित्य देण्याचेही आश्वासन दिले होते. पण आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा तिथे कोणीच नव्हते आणि सर्व आयोजकांचे फोन बंद झाले होते अशी आपबिती हरनियाकलन गावातून आलेल्या राहुल नावाच्या एका तरुणाने सांगितली. या टोळीने फसवणुकीचे नियोजन अत्यंत चलाखीने केले होते. अशोक नावाच्या एका पीडित नवरदेवाने सांगितले की आम्हाला घरून साध्या कपड्यांमध्ये येण्यास सांगण्यात आले होते. लग्नाचे कपडे (शेरवानी) आणि विवाहाचे सर्व विधी तिथेच केले जातील, असे आयोजकांनी सांगितले होते. इतकेच नाही तर घरून हळद किंवा मेहंदी लावून येऊ नका, सर्व विधी विवाहस्थळीच होतील, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली होती.
इंटरनेटवरील फोटो दाखवून केला बनाव
मिळालेल्या माहितीनुसार, या फसवणुकीसाठी प्रत्येक नवरदेवाकडून १५,००० ते २५,००० रुपयांपर्यंत ‘नोंदणी शुल्क’ उकळण्यात आले होते. लग्न ठरवण्यापूर्वी मध्यस्थांनी तरुणांना मोबाईलवर मुलींचे फोटो दाखवले होते. या मुली गरीब असून अनाथाश्रमात वाढल्या आहेत, त्यामुळे त्या लगेच लग्नास तयार असल्याचे तरुणांना सांगण्यात आले.
















