मालवाहतूक महागली, दूध, तेल, भाज्या, डाळींसह जीवनावश्यक वस्तू कडाडल्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात आज मोदी सरकारच्या सत्तेची तपपूर्ती साजरी होत असताना आर्थिक महासंकट, महागाईचा अभूतपूर्व भडका यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका-इराण युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आणि रुपयाचीही मोठी घसरण झाली. यातून देशावरच आर्थिक संकट ओढवले असून, यातून केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, सीएनजीच्या दरवाढीचा धडाका सुरू केला. दोन आठवड्यांपेक्षा कमी काळात सलग चौथ्यांदा पेट्रोल, डिझेल, सीएनजीचा दर वाढविला. केंद्र सरकारने अत्यंत निर्दयीपणे दरवाढीचा धडाका सुरू ठेवल्याने माल वाहतूक, प्रवास खर्च वाढला आणि जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, संपूर्ण देश महागाईच्या खाईत होरपळत आहे. यामुळे देशात असंतोष वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०२६ रोजी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण केली. त्यामुळे देशात मोदी सरकारची तपपूर्ती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती या विशेष संग्रा अंकाचे प्रकाशन झाले. मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे हा सोहळा पार पडला. देशात मोदींच्या सत्तेची तपपूर्ती उत्साहात साजरी होत असताना नेमक्या याचवेळी देशात महागाईचा आगडोंब उसळला. पेट्रोल, डिझेल, सीएनजीसह सर्वच वस्तूंचे दर सातत्याने वाढविले जात असून, यामुळे अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. यातून जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी केंद्र सरकारने इंधनाच्या किमती वाढवल्या. १५ मे रोजी पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रथम प्रतिलिटर ३ रुपयांनी दरवाढ केली. त्यानंतर १९ मे रोजी ९४ ते ९७ पैशांची वाढ केली. त्यानंतर लगेचच शनिवारी तिसरी दरवाढ केली. त्यानंतर सोमवारीही त्यापेक्षा दोन पावले पुढे टाकत पेट्रोल, डिझेलच्या दरात तब्बल पावणेतीन रुपये वाढविले. वाढत्या इंधन दरांचा परिणाम केवळ तुमच्या दैनंदिन प्रवासावरच नाही तर इतर सेवांवर आणि वस्तू खरेदीवर झाला. त्यामुळे .या दरवाढीची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
अर्थात, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे फूड डिलिव्हरी आणि किराणा मालापासून ते बाहेर जेवण्यापर्यंतचा दैनंदिन खर्च वाढला आहे. यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा खर्चही वाढला असल्याने ग्राहकांच्या घरगुती बजेटवर परिणाम झाला आहे. इंधनाच्या किमतींचा परिणाम वाहतूक आणि पुरवठा साखळीवर झाला आहे. त्यामुळे मुख्य धान्य, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होऊ लागल्या आहेत. यासोबतच भाजीपाला कडाडला, खाद्यतेल तडकले आणि किराणा मालाचे दर वाढले आहे. त्यामुळे रोजचे जगणे आता महाग झाले आहे.
सीएनजी महागला
एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा धडाका सुरू असताना आज सीएनजीच्या दरात वाढ केली. सीएनजीच्या दरातही १२ दिवसांत ४ वेळा वाढ झाली. त्यानुसार १२ दिवसांत सीएनजी ६ रूपयांनी वाढला. १५ मे रोजी सीएनजीच्या दरात २ रूपये वाढविले. १७ मे रोजी पुन्हा १ रूपये आणि २३ मे रोजी १ रुपयाने सीएनजी वाढला. त्यानंतर आज २६ मे रोजी चौथ्यांदा २ रुपयांनी सीएनजी वाढला.
दूध, भाजीपाला महागला
पेट्रोल, डिझेलनंतर सीएनजी किलोमागे ३ ते ४ रुपयांनी महागला. त्यामुळे मालवाहतुकीचे दरही वाढले आणि वाहतूक खर्च वाढल्याने वस्तूंचे दरही वाढविण्यात आले. सोबतच अमूल, मदर डेअरी आणि गोकुळ दूध लिटरमागे दोन रुपयांनी वाढले. पॅकबंद तांदुळ गुणवत्तेनुसार ४२ ते १५० रुपये किलोने घ्यावा लागत आहे. तसेच रोज लागणा-या भाज्या प्रचंड महागल्या आहेत.
खाद्य तेलाचे दर वाढले
सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाचे दर १० ते १५ रुपयांनी लिटरमागे वाढले आहेत. जे ब्रॅण्ड १४० ते १४५ रुपये लिटरने मिळत. ते किरकोळ बाजारात आता १६७ ते १८७ रुपये लिटरने घ्यावे लागत आहेत. १५ किलोंचा कॅन जो २००० ते २५०० रुपयांना मिळत असे, त्यासाठी ३००० ते ३५०० रुपये मोजावे लागत आहेत. चांगल्या कंपनीची तूरडाळ किरकोळ बाजारात १०० ते १३० रुपये किलोवर पोहोचली आहे.
पाणीही महागणार
आता बाटलीबंद पाणी कोणत्याही क्षणी महागण्याची शक्यता आहे. एक लिटरची बाटली २० रुपयांवरून २५ वर तर ५०० मिली लिटरची बाटली १० वरून १२ रुपयांवर जाऊ शकते. रोज लागणारा अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण/पावडर, पॅकबंद अन्न पदार्थ आणि घरगुती अत्यावश्यक वस्तूंचे दर एफएमसीजी कंपन्यांनी वाढवले आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे.
















