नवी दिल्ली : गेल्या वर्षी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पीओके आणि पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पराक्रम गाजवला होता. पाकिस्तानला धडा शिकवणा-या या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पराक्रमाची शर्थ करणा-या भारताच्या ६ जवानांना वीरमरण आले होते. आता या जवानांची नावे सरकारने पहिल्यांदाज अधिकृतपणे जाहीर केली आहेत. या शूरवीर जवानांच्या नावांचा समावेश समावेश राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ‘रोल ऑफ ऑनर्स’मध्ये करून ती दिल्लीतील स्मारकावर कोरण्यात आली आहेत.
राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या २०२५ या विभागातील वॉल ३डीवर या सहा वीर जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. वीरमरण आलेल्या जवानांमध्ये लष्कर आणि वायुसेनेच्या जवानांचा समावेश आहे. रायफलमन सुनील कुमार यांना मरणोत्तर वीर चक्र, तर सार्जंट सुरेंद्र कुमार यांना वायू सेना पदक देण्यात आले. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिक ठार झाले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध भडकले होते. चार दिवस चाललेल्या या युद्धादरम्यान भारताचे किती नुकसान झाले हे समोर आले नव्हते. यावेळी राबवण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेतील शहीदांची नावे किंवा इतर माहिती जाहीर केली नव्हती. आता राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या संकेतस्थळावर आणि स्मारकावर या नावांचा समावेश केल्यामुळे या मोहिमेत बलिदान देणा-यांची ओळख देशसमोर आली आहे.
६ वीर जवानांची नावे
– सुभेदार मेजर पवन कुमार – मुख्यालय १० इन्फंट्री ब्रिगेड
– रायफलमन सुनील कुमार (वीर चक्र) – ४ जम्मू आणि काश्मीर लाइट इन्फंट्री
– लान्स नाईक दिनेश कुमार – ५ फील्ड रेजिमेंट
– एव्हिएशन टेक्निशियन मूड मुरलीनाईक – ८५१ लाइट रेजिमेंट
– हवालदार सुनील कुमार सिंग – २३७ फील्ड वर्कशॉप कंपनी
– सार्जंट सुरेंद्र कुमार (वायू सेना पदक) – ३९ विंग
















