नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारताने रशियावर अधिक दबाव आणला, तर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपली भूमिका बदलून युरोपमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतील, अशी आशा एस्टोनिया या देशाच्या मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
सन २०२२ पासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. अद्यापही हे युद्ध थांबलेले नाही. रशिया आणि युक्रेन यापैकी कोणताही देश माघार घ्यायला तयार नाही. दोन्ही देशांमधील तणाव कमी होताना दिसत नाही. परंतु, आता शांततेच्या आशा आता वाढत असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, या युद्धामुळे एस्टोनियासारख्या लहान युरोपीय देशांनाही रशियाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यातच एस्टोनियाचे परराष्ट्र मंत्री मार्गुस त्साहकना भारत दौ-यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी भारताच्या भूमिकेचे स्वागत केले.
एएनआयला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत एस्टोनियाच्या परराष्ट्र मंर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले, आम्हाला युरोपमध्ये शांतता हवी आहे, परंतु रशिया अद्याप आपली ध्येय बदलण्यास तयार नाही. भारत एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताने रशियावर आणखी दबाव आणला, तर आम्हाला आशा आहे की पुतिन आपला मार्ग बदलतील. युद्ध थांबवण्यासाठी रशिया अद्याप पूर्णपणे तयार नाही, परंतु भारतासारख्या देशांचा प्रभाव कामी येऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी केलेले हे विधान भारताचा वाढता जागतिक राजनैतिक प्रभाव दर्शवते, असे म्हटले जात आहे.
युद्ध आता अंतिम टप्प्यात : पुतिन
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतेच विजय दिनाच्या संचलनानंतर सांगितले की, युक्रेनसोबतचे युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. काही परकीय देशांमधील जागतिकवादी घटकांनी रशियाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी युक्रेनचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. युक्रेनने सुरुवातीला सहमती दर्शवली होती, परंतु ब्रिटन आणि फ्रान्सच्या दबावामुळे ते मागे हटले. ते युक्रेनच्या माध्यमातून आमच्यावर युद्ध लादत आहेत. युरोपमधील राजकीय बदलामुळे हा संघर्ष संपुष्टात येईल.
















