मुंबई : प्रतिनिधी
येथील जैन धर्मगुरूंसाठी रस्त्यांवर रंगवण्यात आलेल्या पांढ-या पट्ट्यांच्या वादाने आता राजकीय रंग घेतला आहे. घाटकोपरमधील एका सोसायटीपासून सुरू झालेला हा वाद थेट दादरपर्यंत पोहोचला असून, मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुंबई महापालिकेने तातडीने पट्टे हटविण्याचे काम सुरू केले.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दादर पश्चिमेतील डी. एस. बाबरेकर मार्गावरील पांढरे पट्टे दुपारी ३ वाजेपर्यंत हटवण्याचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा मनसे कार्यकर्ते स्वत: त्या पट्ट्यांवर काळा रंग फासतील, असा इशारा त्यांनी दिला. या इशा-यानंतर महापालिकेचे अधिकारी थिनर आणि अन्य साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि पट्टे हटवण्याचे काम सुरू केले.
दुसरीकडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही यावर वक्तव्य केले आहे. येथे सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. या वादामागे कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दादरमध्ये स्थानिकांनीही माध्यमांना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. धर्माच्या नावावर असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे स्थानिक म्हणाले.
घाटकोपर-विद्याविहार परिसरातील कैलास अॅव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरू आणि साध्वींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर पांढ-या रंगाची पट्टी रंगवण्यात आली होती. धार्मिक परंपरेनुसार या पट्टीवरून धर्मगुरूंची वर्दळ व्हावी, या उद्देशाने ती आखण्यात आल्याचे सांगितले गेले. मात्र, या प्रकाराचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. सार्वजनिक जागेवर कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी वेगळ्या प्रकारची व्यवस्था करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यूट्यूबर प्रसाद वेदपाठकने उचलला मुद्दा
या प्रकरणाला सर्वप्रथम मोठी प्रसिद्धी मिळाली ती युट्यूबर प्रसाद वेदपाठक यांच्या व्हीडीओमुळे. त्यांनी आपल्या सोसायटी परिसरात काढण्यात आलेल्या पांढ-या पट्ट्यांवर आक्षेप घेतला होता. वेदपाठक यांचा दावा होता की, सोसायटीतील सर्व सदस्यांची परवानगी न घेता हे काम करण्यात आले. धार्मिक श्रद्धांचा आदर असला तरी सार्वजनिक जागेत अशा प्रकारचे वेगळेपण निर्माण करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या भूमिकेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.
दादरमध्येही आढळले पांढरे पट्टे
घाटकोपरमधील वाद सुरू असतानाच दादर पश्चिमेतील बाबरेकर मार्गावरही अशाच प्रकारचे पांढरे पट्टे रंगवण्यात आल्याचे समोर आले. जैन मंदिराजवळील लेनमध्ये सुरुवातीपासून ते गोकुळधाम इमारतीपर्यंत ही पट्टी काढण्यात आली होती. याची माहिती समोर येताच मनसेने तीव्र आक्षेप घेतला. संदीप देशपांडे यांनी हे सार्वजनिक रस्त्यांचे खासगीकरण असल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली. देशपांडे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर दादर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बीएमसीची तातडीची कारवाई
वाद वाढत असल्याचे लक्षात येताच मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी घटनास्थळी पोहोचून पांढरे पट्टे हटवण्याचे काम सुरू केले. थिनर आणि अन्य साहित्याच्या मदतीने रस्त्यावरचे रंग पुसण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. महापालिकेच्या या कारवाईमुळे मनसेने दिलेला इशारा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
















