मुंबई : प्रतिनिधी
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी केलेल्या गैरवर्तनाचे व्हीडीओ समोर आल्यानंतर आज विधानसभेत याचे तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सरकारकडून तातडीने कारवाईची मागणी केली.
महाराष्ट्रात पत्रकारही सुरक्षित नाहीत – नाना पटोले
नाना पटोले यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले, खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेली धमकी संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर पाहिली आहे. जर राज्यात लोकप्रतिनिधीच पत्रकारांवर हल्ला करण्याची आणि त्यांना मारण्याची भाषा करत असतील, तर महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? इथे पत्रकारही सुरक्षित राहिलेले नाहीत. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेऊन तातडीने सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी पटोले यांनी केली.
भास्कर जाधवांचा सरकारवर प्रहार
आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात पॉईंट ऑफ प्रोसिजर उपस्थित करत थेट सरकारवर निशाणा साधला. विधान परिषदेतील उपसभापतींच्या निर्देशांचा संदर्भ देत ते म्हणाले, हा दोन पक्षांमधील संघर्षाचा विषय नाही. हा सभागृहाच्या प्रतिष्ठेचा, परंपरेचा आणि घटनात्मक अधिकारांचा प्रश्न आहे. एखाद्याला वाचवण्यासाठी विधिमंडळाचे अधिकार दुबळे केले जात आहेत. भाषणाच्या शेवटी त्यांनी, पत्रकारांना धमक्या देणा-या आणि अश्लील शिवीगाळ करणा-या मुजोर संजय दिना पाटील यांच्यावर सरकार कारवाई कधी करणार? असा थेट सवाल उपस्थित केला.
‘मिंधे टोळीची’ संस्कृती : आदित्य ठाकरे
सहा खासदार शिंदे गटात गेल्यानंतर आनंदोत्सव होण्याऐवजी शिवीगाळ आणि धमक्या समोर येत आहेत, असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, हीच ‘मिंधे टोळीची’ संस्कृती आहे. जर या खासदारांत एवढाच दम असेल, तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि भाजप किंवा शिंदेंच्या चेह-यावर पुन्हा निवडणूक लढवून दाखवावी.
कायदा-सुव्यवस्था रसातळाला : भास्कर जाधव
सभागृहाबाहेर भास्कर जाधव म्हणाले, सत्ताधारी पक्षातील लोक काहीही बोलले तरी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. पोलिसांसमोर उभे राहून पत्रकारांना ‘मारेन’ म्हणण्याची हिंमत त्यांना सत्तेच्या पाठबळामुळेच आली आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था रसातळाला गेली आहे.
सत्ता, संपत्तीचा माज : अंबादास दानवे
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले, सत्ता आणि संपत्तीचा माज अनेकांच्या डोक्यात गेला आहे. एखादा खासदार कोणत्या आधारावर बॉम्ब फेकण्याची किंवा बंदुकीने उडवण्याची भाषा करतो? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे.
संजय राऊतांचे पोलिसांना पत्र
यापूर्वी, संजय दिना पाटील यांच्या जीवघेण्या इशा-यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. पाकिस्तानवर बॉम्ब टाकण्यापूर्वी भारताला १०० वेळा विचार करावा लागतो, पण हे महाशय थेट बॉम्ब टाकण्याची भाषा करत आहेत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा असून त्यांच्यावर ‘यूएपीए’ सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.
संजय दिना पाटलांची सारवासारव
आपल्या विधानावर सारवासारव करताना संजय दिना पाटील म्हणाले की, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मी ‘जन्मायच्या अगोदर असं एकदा झालं होतं, तेव्हा ५ लोक मेले होते’ असे म्हणालो होतो. मात्र, हे स्पष्टीकरण देतानाच त्यांनी पत्रकारांना केलेल्या अश्लील शिवीगाळीमुळे आता ते पूर्णपणे कोंडीत सापडले असून विधानसभेतूनही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
















