लोकसभा खासदार फुटीच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक नवा धक्का दिला. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती मानले जाणारे सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची उमेदवारी देऊन शिंदे यांनी ठाकरे गटाला नव्याने शह दिला. फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौरा आटोपून मुंबईत परतलेल्या उद्धव ठाकरे यांना आणखी एका धक्क्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे सध्या ठाकरे गटाची स्थिती ‘धक धक करने लगा’ अशी झाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतिपदासाठी बुधवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या वतीने नाट्यमयरीत्या सचिन अहिर यांनी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित होते. शिंदे गटाकडून अहिर यांच्या उमेदवारीविषयी प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. उपसभापतिपदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिका-यांच्या दालनात दाखल होईपर्यंत ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना शिंदेंच्या खेळीची कोणतीही कल्पना नव्हती. सचिन अहिर शिंदेंच्या गोटात दाखल झाल्याची बातमी ही ठाकरे गटाच्या बहुतांश आमदारांना प्रसारमाध्यमांकडून समजली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सचिन अहिर हे एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पक्ष कार्यालय असलेल्या ‘बाळासाहेब भवन’ येथे दाखल झाले.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे यांनी सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर विधान परिषदेत निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले आहे. त्यामुळे अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत, असे सांगितले. विधान परिषदेत महायुतीकडे बहुमत असल्याने उपसभापतिपदी अहिर यांचीच निवड होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. बुधवारी अहिर यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली.अहिर यांना पक्षात अनेक महत्त्वाच्या जबाबदा-या दिल्या होत्या. ते उपनेते होते, त्यांना विधान परिषदेवर संधी दिली, कामगार सेनेतील पद दिले, बेस्ट युनियनचे अध्यक्षपद दिले आणि त्यांच्या मुलीच्या एनजीओला वॉर्ड स्तरावरील समितीत जागा दिली. आम्ही त्यांना काय दिले नाही? असा सवालही त्यांनी केला. सचिन अहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा कोणताही अडथळा नाही. कारण विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांना पक्षांतर बंदी कायद्यातील तरतुदी लागू नाहीत, असे विधिमंडळ सचिवालयाच्या सूत्रांनी सांगितले. पीठासन अधिकारी हे पद कोणत्याही पक्षाचे नसते.
जर पीठासन अधिकारी पदावर निवडून आल्यानंतर त्यांनी अन्य पक्षात प्रवेश केला आणि त्यांच्यावर घटनेच्या अनुसूची १० अंतर्गत कारवाई करण्यासाठी कुणी अर्ज केला तर त्यावर पुढे कारवाई होऊ शकते. विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची माळ सचिन अहिर यांच्या गळ्यात पडल्याने या पदाच्या दावेदार डॉ. नीलम गो-हे यांचा हिरमोड झाला आहे. पुन्हा संधी मिळेल अशी डॉ. गो-हे यांना खात्री होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णयाने त्यांचे स्वप्न भंगले आहे. उपसभापतिपदाच्या या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधी ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. विधान परिषदेत महायुतीचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अभ्यंकर यांचा अहिर यांच्यासमोर निभाव लागणे कठीण दिसत होते. अखेर बुधवारी अभ्यंकर यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापतिपदावर बसवण्याची तयारी करून एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची राजकीय नाकेबंदी करण्याची खेळी केल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. अहिर यांना सत्तेतील पदाच्या माध्यमातून बळ देत २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंसमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे.
अहिर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदावर होते. उद्धव ठाकरे यांनी हाती शिवबंधन बांधून अहिर यांचे पक्षात स्वागत केले होते. अहिर यांच्या साथीमुळे २०१९च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे वरळीतून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव झाल्याने अनेकांप्रमाणे अहिर यांनाही पुढील राजकीय भवितव्याची चिंता सतावत होती. अहिर यांची विधान परिषदेची मुदत जुलै २०२८ मध्ये संपत आहे. ठाकरे गटाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता अहिर यांना विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत साशंकता होती. त्यामुळे त्यांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. आता सत्तेच्या माध्यमातून पुन्हा वरळी मतदारसंघात बस्तान बसवण्याचे प्रयत्न अहिर यांच्याकडून होतील. सत्तेतून बाहेर गेल्यापासून अहिर यांनी वरळीतील दहीहंडी उत्सवाचे आयोजन बंद केले होते. आता २०२९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अहिर हे वरळीत पुन्हा सक्रिय होऊ शकतात. २०२४च्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांच्या विरोधात कमी मताधिक्याने निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांना २०२९ च्या निवडणुकीत सचिन अहिर यांचे आव्हान असणार आहे. अहिर हे आदित्य यांचे उजवे हात मानले जात होते.
आदित्य यांच्या विरोधात आपण लढणार नाही असे त्यांनी म्हटले असले तरी ते काही खरे नाही. कारण युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते. देशात, विशेषत: महाराष्ट्रात सध्या ज्या प्रकारचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे, त्याला काही मर्यादा आहे की नाही असा संतप्त सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी सत्ताधारी आणि पक्षांतर करणा-या नेत्यांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. सध्याचा मूळ प्रश्न हा लोकप्रतिनिधींना विकत घेणा-यांचा नसून, स्वत:ची निष्ठा विकायला काढणा-यांचा आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. राजकीय मूल्यांच्या घसरणीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्या महाराष्ट्रात केवळ फोडाफोडीचेच राजकारण पहायला मिळत आहे. राजकारणाचे उद्दिष्ट आता लोककल्याण राहिले नसून, केवळ सत्ता मिळवणे, पक्ष फोडणे आणि त्यातून अमाप पैसा कमावणे एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. राजकीय पक्षांचे संपूर्ण लक्ष केवळ निवडणुका आणि सत्तेच्या समीकरणावर केंद्रित आहे. एकंदरीत फोडाफोडीची तेजी पाहता दिवसागणिक ठाकरे गटाची धडधड वाढत जाणार असे दिसते.
















