नवी दिल्ली : एक काळ असा होता की जेव्हा मुलाने कसेही करून एकदा इंजिनीअरिंग कॉलेजची पायरी ओलांडली की त्याचे भविष्य सुरक्षित झाले, असे स्वप्न आई-वडील पाहायचे. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील इंजिनीअरिंगच्या ब-याच कॉलेजला आता कुलूप लागत असल्याचे समोर आले आहे. या वर्षी देशभरातील एकूण ५८ इंजिनीअरिंग आणि तंत्रशिक्षण महाविद्यालये बंद झाली आहेत. यामध्ये सर्वात वाईट अवस्था महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची असून इथे सर्वाधिक कॉलेज बंद करण्यात आले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ दरम्यान देशभरातील ५८ इंजिनीअरिंग आणि तंत्रशिक्षण संस्थांना प्रोग्रेसिव्ह क्लोजर म्हणजेच संस्था बंद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, ही कॉलेजेस आता पहिल्या वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश घेऊ शकणार नाहीत. मात्र, जे विद्यार्थी आधीपासूनच तिथे शिकत आहेत, त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता येईल. याशिवाय, विविध कॉलेजमध्ये चालणारे सुमारे ९५० हून अधिक अभ्यासक्रमही पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
कॉलेज बंद होण्यामागची मुख्य कारणे
यामागे विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगकडे पाठ फिरवली असे नसून, यामागे काही गंभीर कारणे आहेत. या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या जागा मोकळ्या राहत होत्या. वर्गखोल्याच रिकाम्या राहिल्यावर महाविद्यालयांचा खर्च भागवणे अशक्य झाले होते. या संस्थांकडे विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकवू शकतील असे तज्ज्ञ प्राध्यापक आणि मार्गदर्शकच नव्हते. तसेच अनेक महाविद्यालयांकडे ना कॉम्प्युटर लॅब होत्या, ना पायाभूत सुविधा. केवळ कागदावर आणि मोठ्या इमारतींमध्ये चालणा-या या महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक शिक्षण मिळत नव्हते. त्यामुळे इथून पदवी घेऊन बाहेर पडणा-या तरुणांना साधी नोकरी मिळणेही कठीण झाले होते. त्यांच्याकडे फक्त पदवी होती, कोणतेही कौशल्य नव्हते.
महाराष्ट्रातील खासगी संस्थांना मोठा फटका
राज्यांचा विचार केल्यास, बंद झालेल्या महाविद्यालयांच्या यादीत महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी १२-१२ इंजिनीअरिंग कॉलेड बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर मध्य प्रदेशमध्ये ८, तेलंगणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी ४, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३, तर गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी २ महाविद्यालये बंद झाली आहेत. बंद झालेल्या ५८ संस्थांपैकी केवळ ३ संस्था शासकीय अनुदानित आहेत. उरलेल्या ५५ संस्था या पूर्णपणे खासगी आहेत.
एआयचा काळ आणि जुना अभ्यासक्रम
सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कोडिंग आणि आयटी क्षेत्राचे स्वरूप बदलले आहे. ज्या इंजिनीअरला कोडिंगसाठी बराच वेळ लागायचा ते आता एआय टूल्स वापरुन काही सेकंदांत करतात. त्यामुळे कंपन्यांना आता एआय टूल्स व्यवस्थापित करू शकणा-या आणि चौकस विचार करू शकणा-या इंजिनीअर्सची गरज आहे.
















