मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाने मराठवाड्याकडे नजर वळवली असून पावसाचा जोर वाढू लागला आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी जालना जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून विदर्भातील अनेक भागात जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत होता. मात्र, गुरुवारी जालना, बदनापूर, अंबड, मंठा, घनसावंगी यासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांवरील उघडिपीचा ताण कमी होण्यास मदत होणार असून पिकांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुरुवारी नांदेड जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अमरावती जिल्ह्यातील सिपना नदीला पूर आला आहे. नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली आहे. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार असून पिकांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने पिकांच्या वाढीबाबत चिंतेत असलेल्या शेतक-यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. काही भागात पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतामध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. कमी उंचीच्या आणि निच-याची सुविधा नसलेल्या शेतीतील पिकांवर परिणाम होऊ शकतो. मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम अथवा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. जुलै संपत आला तरी अजूनही काही भागात पेरण्या झालेल्या नाहीत. ढगाळ वातावरण तयार होत असले तरी ब-याच ठिकाणी पावसाची हुलकावणी पहायला मिळत होती. भूम आणि लोहारा तालुक्यात हलक्या सरी कोसळल्या तर उमरगा तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
तुळजापूर तालुक्यात भुरभुर तर परंडा, वाशी आणि कळंब तालुक्यात रिमझिम पाऊस झाला. बीड जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ तर राज्यातील बहुतांश भागासाठी ‘यलो’ व ‘ग्रीन अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागासाठी ‘ग्रीन अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मराठवाड्यात गुरुवारी सर्वदूर दमदार पाऊस झाला. नांदेड, लातूर, हिंगोली, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात जोरदार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर ६.२ मिमी, जालना ५.१, बीड ६.२, लातूर १९.३, धाराशिव ३.४, नांदेड ३५.५, परभणी १४.१, हिंगोली २०.१ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला. विभागात एकूण १४.५ मिमी पावसाची नोंद झाली. विभागात आतापर्यंत सरासरी ३१४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असताना फक्त २५८ मिमी पाऊस झाला आहे.
या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात पावसासाठी अनुकूल वातावरण असल्याने पुढील काही तासांत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ६ ऑगस्टपर्यंत मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात नेहमीच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर थोडा कमी होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील चार-पाच दिवस विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात अजूनही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस मराठवाड्यासाठी महत्त्वाचे आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील ४ लाख ३६ हजार ५७१ हेक्टरवरील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. जून महिन्यात नगण्य पाऊस झाल्याने लातूर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले होते. बुधवारपासून जिल्ह्यातील ब-याच ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता,
मात्र रात्री पावसाचा जोर वाढला. औसा तालुक्यात सुमारे ३० टक्के खरीप पिकांना जीवदान मिळाले. निलंगा तालुक्यातही चांगला पाऊस झाला. देवणी तालुक्यात केवळ १५ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गुरुवारच्या पावसामुळे तेथे आता पेरण्यांना वेग येईल. शिरूर अनंतपाळ, उदगीर, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, जळकोट तालुक्यातही चांगला पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात पावसात सातत्य नसल्याने अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या. दोन दिवसांपासून ब-यापैकी पाऊस झाल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या होत्या तेथे पिकांची वाढ खुंटली होती. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आता पिकेही वाढीला लागतील. रिमझिम का होईना पण पाऊस पडत असल्याने जमिनीत पाणी मुरून पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. धाराशिव जिल्ह्यावर पावसाने वक्रदृष्टी केली होती परंतु तेथेही दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे खरीप पिके तरारून उठण्यास मदत होईल.
















