परभणी : (सुधीर गो. बोर्डे)
जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात सरासरी ३६४.५ मि.मी. पाऊस होतो. त्या तुलनेत जिल्ह्यात या दोन महिन्यात ३०४.८ मि. मी. पाऊस झाला आहे. सरासरीच्या ८३.६ टक्के पाऊस झाला असला तरी अद्यापही जिल्हा तहानलेलाच आहे. निम्न दुधना, येलदरी या प्रमुख धरणांमध्ये अद्यापही समाधानकारक पाणीसाठा नाही.
त्यामुळे या दोन्ही धरणांच्या क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे. दरम्यान पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण व ढालेगाव बंधा-यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. यातील ढालेगाव बंधा-याचे १ दार उघडून ६७९२ तर तारूगव्हाण बंधा-याचे १ दार सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून ८३००.३१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात ३०४.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये परभणी तालुका ३१०.१ मि.मी., पाथरी ३०१.८ मि.मी., जिंतूर ३४६.६ मि. मी., पूर्णा ३६९.१ मि. मी., पालम ३०५.३ मि. मी., सेलू २८३.८ . मि. मी., गंगाखेड ३१८.० मि. मी., सोनपेठ २३०.२ मि. मी. तर मानवत तालुक्यात २८३.४ मि. मी. पाऊस झाला आहे. यात सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या तालुक्यातील नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या तालुक्यात पाऊस अद्याप म्हणावा तेवढा झाला नसला तरी या तालुक्याच्या शेजारीच असणा-या गोदावरी नदीला मात्र सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
ढालेगाव बंधा-यात ७०.५२ टक्के पाणीसाठा
पाथरी पासून जवळ असलेला ढालेगाव बंधा-याची पाणीसाठा क्षमता १३.५० दलघमी. असून सद्यस्थितीत या ठिकाणी ९.५२ दलघमी. पाणीसाठा आहे. या ठिकाणच्या उपलब्ध पाण्याची टक्केवारी ७०.५२ टक्के आहे. या बंधा-यातील पाण्याची आवक पाहता या ठिकाणच्या बंधा-याचे गेट नंबर ५ उघडण्यात आले असून त्याद्वारे ६७९२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गाकडे आहे. त्यामुळे जायकवाडीतून होणारी पाण्याची आवक लक्षात घेता गोदारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ढालेगाव बंधा-यात देखील पाण्याची आवक वाढणार आहे. त्यामुळे ढालेगाव बंधारा पूर्ण क्षमतेने भरणे पाथरी, मानवत तालुक्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.
तारूगव्हाण बंधा-यात ९२.०९ टक्के पाणीसाठा
पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण उच्च पातळी बंधारा दि.१० ऑगस्ट रोजी ९२.०९ टक्के भरला आहे. या बंधा-यातील पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असणारी पाण्याची आवक पाहता सोमवारी दुपारी २ वाजता बंधा-याचे एक दार उघडून गोदावरी नदी पात्रात ८३००.३१ क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. येणा-या पाण्याच्या आवक नुसार सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होऊ शकते. तरी कुणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यातील नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा लघु पाटबंधारे विभाग, परभणीकडून देण्यात आला आहे.
















