मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून पुन्हा एकदा एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा रंगली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे सर्व खासदार आज बुधवारी दिल्लीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला ९ पैकी फक्त ४ खासदार उपस्थित राहिल्याने या चर्चांना उधाण आले असून ठाकरे गटात पुन्हा एकदा मोठी पडझड होण्याची चिन्हे आहेत.
मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता नांदेड विमानतळावरून एक चार्टर्ड विमान दिल्लीकडे रवाना झाले. या विमानामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यासह आणखी एक खासदार उपस्थित होते. यासोबतच शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरेही दिल्लीत दाखल झाले असून हे सर्व खासदार सध्या ‘नॉट रिचेबल’ आहेत. हे खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याशिवाय संजय दिना पाटील मुंबईत आणि ओमराजे निंबाळकर पुण्यात असल्याची माहिती आहे.
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही वेगवान हालचाली पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात ‘नंदनवन’ या निवासस्थानी रात्री उशिरा एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे रात्रीच दिल्लीसाठी रवाना झाल्याचे समजते. दुसरीकडे, शिंदे सेनेचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्लीत आधीच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्याने ‘ऑपरेशन टायगर’ला कमालीचा वेग आल्याचे स्पष्ट होत आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर महाराष्ट्रात या ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू झाली. १४ जून रोजी उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला ९ पैकी ५ खासदारांनी दांडी मारली होती. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी मतदारसंघात धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे कारण देत अनुपस्थिती दर्शवली होती. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, संजय जाधव हे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रात मंत्रिपद आणि मतदारसंघासाठी मोठ्या निधीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघातही मोठा विकासनिधी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.
एकीकडे खासदार फुटण्याच्या चर्चांना उधाण आले असताना, ठाकरे गटानेही आपल्या बाजूने हालचाली तीव्र केल्या आहेत. ठाकरे सेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आणि खासदार संजय राऊत यांनी संभाव्य फूट रोखण्यासाठी आणि तांत्रिक बाजू मजबूत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील खासदारांचा गट अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होणार का, आणि यावर लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
















