नवी दिल्ली : काँग्रेसने आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला. या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. निवडणूक रोख्यांमधील ५६ टक्के रक्कम भाजपने गोठवल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.
७० वर्षाच्या इतिहासात कधीही झाले नाही. आता १८ व्या लोकसभा निडणुकीत विरोधकांवर दबाव निर्माण करुन भाजप एकतर्फी निवडणुका करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व पक्षांना नियम समान पाहीजेत, असे खरगे म्हणाले.
टॅक्सबाबत देखील काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपने कधी टॅक्स भरला नाही. मात्र आमची खाती गोठवली, असे खरगे यांनी म्हटले आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकशाहीसाठी हे महत्त्वाचे आहे की निवडणुका निष्पक्षपणे पार पडणे आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध करून देणे. मात्र ईडी, आयटी आणि इतर स्वायत्त संस्थांवर केंद्राचे नियंत्रण असे असू नये. गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर, निवडणूक रोख्यांबाबत समोर आलेल्या तथ्यांमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे.