मुंबई : अलीकडेच, सेबीने शेअर बाजारातील वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. ‘सेबी’ प्रमुख म्हणाल्या होत्या की, बाजाराने गेल्या ३ महिन्यांत जबरदस्त परतावा दिला आहे, स्मॉल आणि मिडकॅप क्षेत्रातील अनेक कंपन्यांच्या मूल्यांकनात विक्रमी वाढ झाली आहे.
अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, त्यानंतर गेल्या २ आठवड्यांपासून बाजारात घसरण दिसून येत आहे. सेबीपाठोपाठ आता आरबीआयनेही शेअर बाजारातील स्मॉल आणि मिडकॅप शेअर्सच्या ‘बबल’वर चिंता व्यक्त केली.
रिझर्व्ह बँकेने देखील आपल्या बुलेटिनमध्ये स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सच्या या बुडबुड्याविषयी इशारा दिला आहे. आरबीआयने आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, अलीकडच्या काळात बाजारात वाढ सुरूच आहे. लार्ज कॅप्स झपाट्याने वाढत आहेत परंतु मिड आणि स्मॉल-कॅप्स अधिक वेगाने वाढत आहेत.
हे बुलेटिन रिझर्व्ह बँकेचे मासिक प्रकाशन आहे, ज्यामध्ये देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वाची माहिती आणि मते मांडली जातात, परंतु ते रिझर्व्ह बँकेचे मत नाही. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की भारतीय शेअर्समध्ये एफपीआय होल्डिंग १६.३% च्या दशकाच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.
मध्यवर्ती बँकेचे म्हणणे आहे की रुपया सतत मजबूत होत आहे. त्यात म्हटले आहे की, ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ तिमाहीत थेट विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) ११.४ टक्क्यांनी वाढ झाली आणि यामुळे रुपयाही मजबूत झाला. रिझर्व्ह बँकेच्या मते, रोखे उत्पन्न ९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे आणि कॉर्पोरेट बाँड्सना जोरदार मागणी आहे.