नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनाचा भव्य ‘गणतंत्र मंडप’ टाळ्यांच्या कडकडाटाने आणि एका नावाने एकदम शांत झाला. “मरणोत्तर पद्मविभूषण, श्री धर्मेंद्र!” त्या एका नावाने तिथल्या हवेत एकाच वेळी आदर, आठवणी आणि एक अनामिक हुरहूर दाटून आली. भारतीय चित्रपटसृष्टीचा ‘हि-मॅन’, प्रेक्षकांचा लाडका ‘वीरु’ आणि खऱ्या आयुष्यातील अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, अभिनेते धर्मेंद्र यांच्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळाच्या अथांग प्रवासाला देशाने दिलेली ही सर्वोच्च सलामी होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी या महानायकाने जगाचा निरोप घेतला. पण, जेव्हा त्यांची पत्नी आणि खासदार हेमा मालिनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला, तेव्हा रुपेरी पडद्याचा हा ढाण्या वाघ देशाच्या इतिहासात मरणोत्तर सन्मानाने अजरामर झाला.
धर्मेंद्र यांच्या प्रवासाची सुरुवात पंजाबच्या सहनेवाल गावच्या तांबड्या मातीतून झाली होती. एक सामान्य शिक्षकाचा मुलगा, जो केवळ चित्रपटांच्या वेडापायी मुंबईत आला. खिशात पैसे नसताना रेल्वेच्या पटऱ्यांवर रात्र काढणारा हा तरुण एक दिवस संपूर्ण देशाच्या मनावर राज्य करेल, असे कोणालाच वाटले नव्हते. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या धर्मेंद्र यांनी केवळ ॲक्शन नाही, तर रोमँटिक आणि विनोदी भूमिकांमध्येही स्वतःचा वेगळा बाज निर्माण केला. त्यांनी ‘फूल और पत्थर’, ‘धशमवीर’, ‘मेरा गाव मेरा देश’ मधून रांगडा नायक साकारला, तर ‘अनुपमा’ आणि ‘सत्यकाम’ सारख्या चित्रपटांतून अत्यंत संवेदनशील अभिनय केला. यासोबतच ‘चुपके चुपके’ आणि ‘शोले’मधील प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा वीरुही त्यांनीच जिवंत केला.
पुरस्कार स्वीकारताना हेमा मालिनी यांचे डोळे पाणावले होते. संपूर्ण देशाला हसवणारा आणि पडद्यावर खलनायकांना धो-धो धुवणारा आपला जोडीदार आज या जगात नाही, ही जाणीव त्या क्षणी अधिक गडद झाली होती. पुरस्कार स्वीकारल्यानंतर हेमा मालिनी अत्यंत भावूक होऊन म्हणाल्या की, हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे. धरमजींनी प्रेक्षकांवर आणि आपल्या कलेवर जीवापाड प्रेम केले. आज देवाने त्यांच्या त्या अथांग प्रेमाची परतफेड या सर्वोच्च सन्मानाने केली आहे. ते जिथे कुठे असतील, तिथून नक्कीच हसत असतील.
धर्मेंद्र यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. १९९७ मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ सेवेसाठी फिल्मफेअर लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला, तर २०१२ मध्ये देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि आता कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण या सर्वोच्च गौरवाने सन्मानित करण्यात आले.
धर्मेंद्र हे बॉलिवूडचे सुपरस्टार असले, तरी त्यांच्यातली मातीची ओढ कधीच सुटली नाही. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते मुंबईच्या झगमगाटापासून दूर आपल्या लोणावळ्यातील फार्महाऊसवर शेती करायचे, जनावरांना चारा घालायचे आणि निसर्गाच्या सानिध्यात कविता लिहायचे. सोशल मीडियावर त्यांचे ते साधे रूप पाहून नवीन पिढीही त्यांच्या प्रेमात पडली होती. आज ते आपल्यात नसले, तरी राष्ट्रपती भवनात त्यांच्या नावाचा झालेला जयघोष हे सांगण्यासाठी पुरेसा आहे की, धरमजी तुमचे चित्रपट, तुमचे ते डायलॉग आणि तुमचे ते निष्पाप हास्य भारतीय सिनेमाच्या पडद्यावरून कधीच पुसले जाऊ शकत नाही.
















