बिकानेर : भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सांगितले की, देशात समानता राखण्यासाठी बंधुभाव खूप महत्त्वाचा आहे. संविधानाच्या भावनेनुसार आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे. लोक आपापसांत भांडले तर देशाची प्रगती कशी होईल? सीजेआय चंद्रचूड बिकानेरच्या हमारा संविधान, हमारा सन्मान कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मानवी प्रतिष्ठेला सर्वोच्च स्थान आहे असे संविधान रचणा-यांचे मत होते, असेही सरन्यायाधीश म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात न्याय, स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांसह बंधुत्व आणि व्यक्तीचा सन्मान राखला जाईल याची खात्री केली होती. न्याय मंत्रालयाने महाराजा गंगा सिंग युनिव्हर्सिटी, बिकानेरच्या सभागृहात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सरन्यायाधीश म्हणाले की, मी अनेकदा पाहतो की लोक त्यांच्या कनिष्ठांकडे आदराने पाहत नाहीत. ड्रायव्हरशी नम्रपणे बोलत नाही. लोकांना वाटते की ड्रायव्हर लहान आहे. ते क्लिनरकडे इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्सने पाहतात. कोणतीही व्यक्ती कमी दर्जाची असू शकते पण त्या व्यक्तीलाही आपल्यासारखेच महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टात एक पोस्ट आहे. ज्याला १९५० पासून जमादार म्हणतात. ७५ वर्षांपासून त्यांना जमादार म्हटले जात होते, आता त्यांचे नाव बदलण्यात आले आहे.
लोकशाही आणि संविधान यांचा संबंध
सीेजेआय म्हणाले की, लोकशाही आणि संविधानाचा संबंध आहे. संविधान समजून घेतल्याने लोकशाहीची समजही विकसित होते. संविधानाचा संदेश प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. संविधानाचा आत्मा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवावा लागेल.
स्थानिक भाषेत निर्णय द्यावा
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की देशातील कोणत्याही न्यायालयात निर्णय स्थानिक भाषेत दिला पाहिजे. मी दिल्लीत बसून वकिलासाठी किंवा न्यायाधीशांसाठी निर्णय देत असेल तर तो अवघड भाषेत असेल, पण मी सामान्यांसाठी निर्णय देत असेल तर तो नक्कीच सोप्या भाषेत असावा. देशातील जिल्हास्तरीय न्यायालयाच्या इमारतींमध्ये सुधारणा व्हायला हव्यात. ही इमारत आधुनिक दर्जाची असावी.