यवतमाळ : प्रतिनिधी
महाराष्ट्रात मागील १५ दिवसांपासून हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात कुठे अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे तर कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात पार्डी परिसरात आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात उन्हाळी पिकांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाले.
दोन-तीन दिवसापासून दररोज रात्री एक ते तीनच्या दरम्यान वादळी वा-यासह जोरदार पाऊस होत असल्याने यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, बाभूळगाव या भागात जवळपास पाचशे हेक्टरवरील उन्हाळी तीळ, ज्वारी, केळी, टरबुज, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे तर अनेक भागात झाडे उन्मळून पडली असून वाहतूक ठप्प झाली होती तर अनेक ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाला असून अद्यापही वीज पुरवठा दुरुस्तीचे काम सुरू आहे.