नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा जेन झींना धमकावून शांत करू शकत नाहीत. मोदी-शाह भारताचा भूतकाळ असून तुम्ही भारताचे भविष्य असलेल्या तरुणांशी कसे वागता याबद्दल सावध रहा, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
पेपरफुटी आणि तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांच्यासह हजारो विद्यार्थी दिल्लीत जमा झाले होते. २० जुलै रोजी संसदेवर मोर्चाही काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि पेलेट गनचाही वापर केला. आंदोलन संपल्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. तसेच विद्यार्थ्यांवर एफआयरही नोंदवल्या जात असून त्यांचे सोशल मिडिया अकाऊंटही हटवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यावरून राहुल गांधी यांनी मोदी, शहांवर हल्ला चढवला आहे.
गुरुवारी सायंकाळी पंतप्रधान मोदी यांनी व्हीडीओ पोस्टच्या माध्यमातून सरकारची भूमिका मांडली. गेल्या अनेक दशकांपासून सर्व राज्य सरकारांसह केंद्र सरकारही पेपरफुटीमुळे त्रस्त आहे. हे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व आवश्यक पावले उचलत आहे. संसदेत मंजूर झालेले विधेयक हा त्याचाच भाग आहे. यामुळे कठोर कायद्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे मोदी म्हणाले.
भारताच्या भुतकाळाने भविष्यापासून सावध राहावे
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह तुम्ही जेन झीला धमकावून शांत करू शकत नाही. आधी तुम्ही त्यांची हाडे मोडली, आता तुम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करत आहात आणि त्यांची अकाउंट्स बंद करत आहात. तुम्ही भारताचा भूतकाळ आहात; भारताच्या भविष्याशी कसे वागायचे याबद्दल सावध राहा असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
















