मुंबई : शिवसेना (उबाठा)चे आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप करत विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना निधीपासून वंचित ठेवण्याचे धोरण राबवले जात असल्याचा दावा केला. लोकप्रतिनिधी दुस-या पक्षाचा आहे म्हणून त्या मतदारसंघातील जनतेलाच ब्लॉक करणे सुरू आहे.
कैलास पाटील म्हणाले की, मंत्रिपदाची शपथ घेताना ममत्वभाव न बाळगता काम करेन अशी शपथ घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात विरोधी पक्षाच्या मतदारसंघांमध्ये विकासकामे आणि निधी रोखला जात असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार किंवा खासदार दुस-या पक्षाचा असला तरी त्या मतदारसंघातील जनता एका पक्षाची नसते. सत्ताधा-यांना मतदान करणारे नागरिकही तिथेच राहतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी विरोधी पक्षाचा आहे म्हणून संपूर्ण जनतेलाच विकासापासून दूर ठेवणे योग्य नाही असे ते म्हणाले. राज्यातील सध्याच्या सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांनी म्हटले की, यापूर्वीही अनेक सरकारे आली आणि विरोधी पक्षही होते. मात्र, आजच्या सरकारने विरोधी पक्षाच्या आमदार, खासदार, नगरसेवक आणि सरपंचांना निधीच मिळू नये, अशी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
यंत्रणा आणि विकासनिधीचा वापर करून विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधी अडचणीत कसा येईल, याचेच नियोजन सत्ताधा-यांनी केले आहे. कुठेही हालचाल करता येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा आरोप त्यांनी केला.
शिवसेना, शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणार
आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना कैलास पाटील म्हणाले की, ते अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून आले असून त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मला जिल्हा परिषद आणि दोन वेळा विधानसभेत जाण्याची संधी केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे ज्यांनी मला शून्यातून उभे केले, त्या पक्षाशी आणि मला निवडून आणणा-या शिवसैनिकांशी प्रामाणिक राहणे हीच माझी पहिली प्राथमिकता आहे असे त्यांनी सांगितले.
















