नाशिक : नाशिकमधून महायुतीकडून निवडणूक लढण्यावर शांतीगिरी महाराज अजूनही ठाम आहेत. आपण मागे हटणार नाही. आता माघार घेणार नाही. महायुतीकडून आपल्यालाच तिकीट मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. ओझरच्या आश्रमात महाराज आणि त्यांच्या भक्तांमध्ये बैठक झाली.
दरम्यान, शांतीगिरी महाराज यांनी कालच शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतीगिरी महाराजांना शिंदेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्मची प्रतीक्षा आहे. अचानक नाशिक दौ-यावर आलेल्या गिरीश महाजनांनी शांतीगिरी महाराजांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे मागणी गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती मिळत आहे.
शांतीगिरी महाराज म्हणाले की, आमची कमिटी नेत्यांच्या भेटीगाठी घेत असतात. आमच्या कमिटीत सर्वच पक्षांचे नेते आहेत. त्यामुळे जो भक्त ज्या पक्षाचा आहे, तो आपल्या नेत्यांशी चर्चा करत असतात. आमची मागणी आहे की, महायुतीने आम्हाला तिकीट द्यावे. ही आग्रही भूमिका आमच्या सर्व भक्त परिवाराने घेतली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा महायुतीत अद्याप कायम आहे. एकीकडे शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी मिळण्यासाठी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिकमधून उमेदवारीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर शांतीगिरी महाराजांनी काल शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे महायुतीत मोठी खळबळ उडाली. यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे आज अचानक नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी भाजपच्या काही पदाधिका-यांसोबत गुप्त बैठक देखील घेतली. आता महायुतीतून नाशिकची जागा शिवसेना, राष्ट्रवादी की भाजप लढवणार? नाशिकमधून नक्की कुणाला उमदेवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.