मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा २७ वा वर्धापन दिन काल ११ जून रोजी मुंबईत अत्यंत भावनिक वातावरणात पार पडला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या पुढील वाटचालीचा रोडमॅप स्पष्ट केला. मात्र, भाषणाच्या सुरुवातीलाच दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
भाषणाची सुरुवात करताना सुनेत्रा पवार यांचा आवाज गहिवरला होता. त्या म्हणाल्या की, आज आपण पक्षाचा २७ वा वर्धापन दिन साजरा करत असताना एक वेगळीच भावना मनात आहे. आपल्या सगळ्यांचे नेते अजितदादा आज आपल्यात नाहीत आणि त्यांच्याशिवाय होणारा हा पक्षाचा पहिलाच वर्धापन दिन आहे. यंदाच्या वर्धापन दिनाची थीम ‘समर्पण, संघर्ष आणि संकल्प’ अशी ठेवण्यात आली असून, हा दिवस त्यांनी पूर्णपणे अजित पवार यांना समर्पित केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणातून पक्षातील शिस्त आणि भविष्यातील धोरणांबाबत स्पष्ट संकेत दिले. त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले की, आतापर्यंत पक्षात जे घडले, त्याबाबत प्रत्येकवेळी त्यांनी सर्वांना समजून आणि सावरून घेतले आहे. अजित पवार यांनी आपल्या हयातीत सर्वांचे हट्ट पुरवले, सर्वांना प्रेम दिले आणि मानसन्मान दिला. परंतु, यापुढे त्या पक्षाच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणार असून, जर कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप होत असेल, तर त्याबाबत नक्कीच कठोर विचार केला जाईल. अजित पवार ज्याप्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत असत, तसाच पवित्रा आता त्यांना घ्यावा लागू शकतो, असेही त्या म्हणाल्या.
पक्षाच्या ध्येयधोरणांवर भाष्य करताना सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आणि शिव-शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा घेऊन पक्ष पुढे जात आहे. अजित पवार यांनी शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांसाठी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. त्यांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, हे वास्तव असले तरी, त्यांनी दाखवलेला विकासाचा मार्ग आणि सर्वसामान्यांची बांधिलकी हीच पक्षाची खरी ताकद आहे. पक्ष आपल्या पाठीशी एक कुटुंब म्हणून उभा राहिला आहे, याची जाणीव आपल्याला असून, अजित पवारांनी अवघ्या अडीच वर्षांत पक्षाला राष्ट्रीय स्तरावर जी ओळख मिळवून दिली, ती पुढे नेण्याचा आपला संकल्प आहे.
शेवटी, कार्यकर्त्यांना आश्वासित करताना त्या म्हणाल्या की, योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी दिली जाईल. कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून पक्षाला बळकटी देण्यासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. अजित पवार यांच्या निधनानंतरची पक्षाची ही पहिली मोठी सभा असल्याने, या कार्यक्रमातील सुनेत्रा पवार यांच्या विधानांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
















