कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणा-या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत आहे. हे लोक स्वत:ची ओळख सांगून बांगलादेशात परत जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.
तथापि, सीमा सुरक्षा दल त्यांना थेट सीमापार पाठवण्याऐवजी बायोमेट्रिक आणि इतर ओळखपत्रे घेऊन बंगालमध्ये तयार केलेल्या होल्डिंग सेंटरमध्ये पाठवत आहे. हकीमपूर सीमेवरील पडताळणी केंद्रावर दररोज सुमारे २०० ते ३०० लोक पडताळणीसाठी पोहोचत आहेत. यापैकी अनेक लोक वर्षांपूर्वी बेकायदेशीरपणे भारतात आले होते आणि आता बदलत्या परिस्थितीमुळे त्यांच्या भविष्याबद्दल चिंतित आहेत. अनेक लोकांकडे भारतीय कागदपत्रे आहेत, परंतु बांगलादेशी ओळखपत्रे नाहीत.
बीएसएफच्या एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की अवैध स्थलांतरितांना शोधण्याची गरज नाही. लोक स्वत: पडताळणी करण्यासाठी आणि आपली ओळख नोंदवण्यासाठी चेकपोस्टवर पोहोचत आहेत. अधिका-यांच्या मते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि पडताळणीला बराच वेळ लागत आहे. स्थानिक संघटना भुका मानुषेर अधिकार अभियान चे अध्यक्ष मोहर मंडल यांच्या मते, पडताळणीसाठी पोहोचलेले बहुतेक लोक बांगलादेशातील सहा जिल्ह्यांतील आहेत आणि ते बेकायदेशीरपणे भारतात आले होते.
भारतात राहू शकत नाही, बांगलादेशात जाऊ शकत नाही
मुंबईत राहणा-या मोहम्मद अख्तर शेख यांनी सांगितले की ते २२ वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात आले होते. त्यांच्याकडे भारतीय आधार कार्ड आहे, पण बांगलादेशाचे कोणतेही कागदपत्र नाही. त्यांना भीती आहे की आता ते ना मुलांसोबत राहू शकतील ना बांगलादेशात जाऊ शकतील. त्याचप्रमाणे, २० वर्षांपूर्वी मुर्शिदाबादच्या जलंगी सीमेवरून भारतात आलेले इस्लाम सरदार बोलता बोलता रडू लागले. ते म्हणतात मी बांगलादेशातील बारीसाल जिल्ह्यातून आलो होतो. दिल्लीच्या झोपडपट्ट्यांमध्ये संपूर्ण आयुष्य घालवले. सर्वात मोठी भीती हीच आहे की दोन्ही देशांपैकी कोणीही आम्हाला स्वीकारले नाही तर काय होईल.
















