डॉ. राजेंद्र भस्मे
हातकणंगले : हातकणंगले मतदारसंघात यावेळी चौरंगी लढत होत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, मविआचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि बहुजन आघाडीचे डी. सी. पाटील आपले भविष्य आजमावण्यासाठी सात तारखेच्या चौरंगी लढतीत मतदानाची अपेक्षा धरून आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे मतदार घराबाहेर पडायला तयार नाहीत पण सर्व सरकारी यंत्रणा मतदान शंभर टक्के करा म्हणून जाहिराती तरी करत आहे. तर मग पाहूया सात तारखेला किती जण मतदान करतील.
महायुतीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील जागावाटपात एका जागेवर लढण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा स्वत:कडे ठेवल्या. उमेदवारीची लढाई शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी जिंकली; पण त्यांच्याबाबत मतदारांमध्ये असलेल्या नाराजीला तोंड देताना त्यांची पुरती दमछाक होत आहे. शिवसेना, जनसुराज्य शक्ती आणि भाजपच्या नेत्यांची मोट ते बांधत आहेत. त्यात यश आले असले तरी कार्यकर्ते मात्र हाताला लागत नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांनीच चार-चार दिवस ठाण मांडून जुळणी लावल्याने किमान काही गोष्टी जुळून आल्या आहेत.
नाराज आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, महाडिक गट, राजेंद्र यड्रावकर प्रचारात उतरल्याने माने यांना दिलासा मिळाला आहे. महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा म्हणून शेट्टी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केला; पण, ‘आघाडीत या’, ‘पुरस्कृत उमेदवारी घ्या’ हा शिवसेना ठाकरे गटाचा हट्ट त्यांना पुरवता आला नाही. यामुळे स्वतंत्रपणे त्यांना मैदानात उतरावे लागले. शेतक-यांच्या ताकदीवर त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. शेट्टींच्या नकारानंतर शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाने माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांची उमेदवारी जाहीर केली. दोन दिवसांतच पूर्ण मतदारसंघात त्यांची हवा झाली. मतदारसंघाच्या पश्चिम भागात प्रथमच उमेदवारी मिळत असल्याने पक्षभेद विसरून हा भाग एकवटला आहे.
याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार मानसिंग नाईक, आमदार राजू आवळे, शिवाजीराव नाईक अशा अनेकांची आणि साखर कारखानदारांची ताकद लागल्याने ते शेवटी येऊन स्पर्धेत आले आहेत वंचितने गेल्या निवडणुकीत सव्वा लाख मते घेतल्याने शेट्टी यांचा पराभव झाला. हीच खेळी यंदा पुन्हा खेळण्यात आली आहे. जैन समाजातील डी. सी. पाटील यांना उमेदवारी देऊन शेट्टींना मिळणा-या मतांत विभागणीची सोय करण्यात आली आहे. शेट्टींचा एकखांबी प्रचार आणि सत्यजित व मानेंच्या बाजूने नेत्यांची फौज असे मतदारसंघांत चित्र आहे. डी. सी. पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील हे किती मते घेणार एवढाच प्रश्न आहे. कागदावर वीसपेक्षा अधिक उमेदवार असले तरी लढत आहे ती चौरंगीच. यातील मतविभागणीचा फटका कुणाला बसणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. शेट्टी आणि सत्यजित यांच्यात टक्कर होत असताना या दोघांतील मतविभागणीचा फायदा माने किती घेणार याची उत्सुकता आहे. या मतदारसंघात जातीय समीकरणे नेहमीच परिणामकारक ठरतात. गेल्या वेळी मराठा कार्ड जोरात चालल्याने मानेंना फायदा झाला. यंदा मात्र मराठा समाज नाराज आहेच, शिवाय दोन उमेदवार या समाजाचे असल्याने विभागणी होणार हे निश्चित आहे. डी. सी. पाटील व शेट्टी हे दोघेही जैन आहेत. त्यांच्यातही विभागणी होणार आहे.
लिंगायत मतांबाबतही हीच परिस्थिती आहे. बंडखोरीचा इशारा दिलेल्या आवाडेंची तलवार म्यान झाली. ते प्रचारात दिसत असले तरी कार्यकर्त्यांची मानसिकता काय आहे हे पाहावे लागेल. ज्या भागातील उमेदवार त्या भागात त्यांना जादा मते मिळण्याची चिन्हे आहेत. याचा फायदा सत्यजित पाटील यांना अधिक होण्याची शक्यता आहे. मोदींची हवा निश्चितच आहे. त्यांच्या सभेमुळे महायुतीच्या बाजूने अनुकूलता वाढली आहे. त्याचा फायदा माने यांना कितपत होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोघेही शेतक-यांना फसवणारे असल्याचा आरोप करून शेट्टी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे दोन्हींकडून मदतीची अपेक्षा पूर्ण होणार का यावरच त्यांच्या मताचा आकडा अवलंबून आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मतविभागणीचा फायदा कुणाला होणार यावरून विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे.