डेहराडून : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील जंगलात शनिवारी लागलेले वणवे नियंत्रणात आणण्याचे काम रविवारी दुस-या दिवशीही सुरू होते. भारतीय हवाई दलाच्या मदतीने अनेक भागांमधील वणव्यांवर नियंत्रण मिळविले असल्याचे अधिका-यांनी सांगितले. वणव्यांमुळे आतापर्यंत ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक झाली आहेत.
नैनिताल, हल्दवानी आणि रामनगर या गावांच्या लगतच्या जंगलांमध्ये वणव्यांचे स्वरूप तीव्र होते. त्यामुळे हवाई दल आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी याच भागावर अधिक लक्ष केंद्रित केले होते. शनिवारपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे आज आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असले तरीही काही भागांमध्ये अद्याप वणवे धुमसत आहेत. नरेंद्रनगर वन विभागाअंतर्गत येणा-या माणिकनाथ डोंगर रांगेत पेटलेले वणवे पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आले असून नैनिताल आणि लगतच्या जंगलातील वणव्यांवर बहुतांशी नियंत्रण मिळविले आहे, असे अधिका-यांंनी सांगितले. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनीही या भागाची हवाई पाहणी केली. जंगलांच्या लगतच्या गावांमधील नागरिकांना जंगलांपासून दूर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.