नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या ३०० वरिष्ठ कर्मचारी सामूहिक रजा घेतल्यामुळे एअरलाइनला किमान ७८ उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही विमानांचा समावेश आहे. मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत ७८ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे प्रवाशांना चांगलीच गैरसोय झाली. नागरी विमान वाहतूक प्राधिकरण सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये विलीनीकरण झाल्याची बातमी आहे. याबाबत कर्मचा-यांमध्ये संताप व्यक्त होत असून कर्मचा-यांचा एक मोठा वर्ग या निर्णयाला सातत्याने विरोध करत आहे. दोन्ही एअरलाइन्सच्या पायलट आणि केबिन क्रूला विलीनीकरणामुळे आपल्या नोक-या धोक्यात आल्या आहेत, असे वाटत आहे.
दुसरीकडे एअर इंडिया एक्स्प्रेसने अधिकृतपणे म्हटले आहे की, वरिष्ठ क्रू मेंबर्स अचानक पुर्वसूचना न देता अचाणक रजेवर गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द करावी लागली. कर्मचा-यांकडून गेल्या काही दिवसांपासून विलीनीकरणाला विरोध होत आहे. मंगळवारी रात्री अचानक वरिष्ठ कर्मचा-यांनी पुर्वकल्पना न देता रजा घेतली. यामुळे विमान कंपन्यांना ८६ हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. मध्य पूर्व आणि आखाती देशांतील उड्डाणे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. तसेच, ज्या फ्लाइट्सने टेक ऑफ केली होती त्यांनाही खूप उशीर झाला.
एअर इंडिया एक्सप्रेसने काय म्हटले ?
दरम्यान, या प्रकरणावर एअर इंडिया एक्सप्रेसने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या एका विभागाची काल रात्रीपासून शेवटच्या क्षणी तब्येत बिघडली आहे, परिणामी फ्लाइटला विलंब झाला आणि अनेक उड्डाणे रद्द झाली. या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रू मेंबर्सशी बोलत आहोत. प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी आमची टीम वेगाने काम करत आहे, असे एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले.