नांदेड: राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असून, त्यानंतरच या निवडणुकीचे अंतिम आणि अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या या मतदारसंघातून एकूण ८ उमेदवार रिंगणात उतरले असले, तरी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांमधील बंडखोरांच्या भूमिकेकडे आणि अंतर्गत समीकरणांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दुपारी ३ नंतर होणाऱ्या माघारीवरच या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
महायुतीमधील अंतर्गत बंडखोरी अखेर टळण्याची चिन्हे असून यामुळे महायुतीच्या गोटात मोठा दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अमरनाथ राजूरकर यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महायुतीमध्ये मोठी बंडखोरी निर्माण झाली होती. या बंडखोरीमुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये तणावाचे वातावरण होते.
परंतु, मुंबईत वरिष्ठ पातळीवर झालेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा वाद अखेर निवळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर आज एका संयुक्त पत्रकार परिषदेत प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या उमेदवारी माघारीची अधिकृत घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे महायुतीमधील बंडखोरी अधिकृतपणे संपुष्टात येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये (मविआ) मात्र जागावाटपाचा तिढा अद्याप पूर्णपणे सुटू शकलेला नाही, ज्यामुळे आघाडीत मोठा ‘सस्पेन्स’ आणि बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाविकास आघाडीकडून तब्बल चार इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यात काँग्रेस पक्षाने माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांना अधिकृत ‘एबी’ फॉर्म दिला आहे. तर काँग्रेसचेच माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आज आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मात्र, मविआसमोरील खरी डोकेदुखी शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोरांमुळे वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे चिरंजीव कृष्णा पाटील आष्टीकर आणि ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी ज्योतिबा खराटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून शड्डू ठोकला आहे. काँग्रेसने सुमठाणकर यांना अधिकृत उमेदवारी दिली असली, तरी ठाकरे गटाच्या या दोन्ही नेत्यांनी माघार घेण्यास नकार दिल्यास मविआची मोठी कोंडी होऊ शकते. मविआचे वरिष्ठ नेते या दोघांची समजूत काढून त्यांचे अर्ज मागे घेण्यात यशस्वी होतात का, यावरच आघाडीची संपूर्ण रणनीती अवलंबून असेल.
या प्रमुख उमेदवारांशिवाय वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशांत इंगोले यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. आज दुपारी ३ वाजेपर्यंत बंडखोरांनी आणि इतर अपक्षांनी मैदानातून माघार घेतल्यास, ही निवडणूक महायुतीचे अमरनाथ राजूरकर विरुद्ध महाविकास आघाडीचे रामदास पाटील सुमठाणकर अशी थेट होणार, की बंडखोरांच्या ठाम भूमिकेमुळे ती तिरंगी किंवा चौरंगी होणार, हे थोड्याच वेळात समोर येईल. या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरणाऱ्या विधानपरिषद जागेसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार असून, सर्वच पक्षांनी आतापासूनच जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे.
















