नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या गंभीर प्रकारावर माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
खड्डयांमुळे गेलेले जीव हे प्रशासन आणि महापालिकेच्या हलगर्जीमुळेच गेल्याचा थेट आरोप भुजबळ यांनी केला. एका मृत्यूसाठी १० लाख रुपयांची मदत दिली गेली आहे, तशीच मदत इतर मृतांच्या कुटुंबीयांनाही मिळाली पाहिजे. पैशांनी जीव परत येत नाही, पण ती मदत महत्त्वाची आहे. नाशिकची अवस्था अत्यंत वाईट झाली असून वाहतूक संथ झाली आहे, ट्रॅफिक जॅम होत आहे. नगरसेवक आणि महापौरही वैतागले आहेत. पाऊस उघडताच ताबडतोब खड्डे भरले पाहिजेत आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अधिकारी केवळ एसी ऑफिसमध्ये बसण्यासाठी नसतात, असे सुनावत त्यांनी अधिका-यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. आयुक्त गेडाम साहेब हे अतिशय उत्कृष्ट अधिकारी आहेत. पण त्यांनी हे काम इतरांवर सोडून दिले, तर ते त्यांचे अपयश गणले जाईल. त्यांनी स्वत: अधिका-यांना सोबत घेऊन नाशिकच्या रस्त्यांवर फिरले पाहिजे.काँट्रॅक्ट दिले आणि मोकळे झाले असे चालणार नाही. ठेकेदार काय करतोय हे पाहिले पाहिजे. कुंभमेळा मंत्री (गिरीश महाजन) आणि आयुक्त गेडाम या दोघांनी यात तातडीने लक्ष घालावे. काम न करणा-या अधिका-यांवरही कारवाई झाली पाहिजे.
कुंभमेळ्याचे काम सांगून जबाबदारी झटकू नका
महापालिकेच्या अधिका-यांकडून कुंभमेळा प्राधिकरणाकडे अंगुलिनिर्देश केला जात असल्याच्या मुद्यावर भुजबळ म्हणाले मी स्वत: महापालिकेत होतो, दोन वेळा महापौर होतो. शहरात कुंभमेळा असो वा इतर काही, रस्त्याची, पाण्याची किंवा बांधकामाची अंतिम जबाबदारी महानगरपालिकेचीच असते. एक वीट जरी हलवायची असेल तर महापालिकेची परवानगी लागते. त्यामुळे हे कुंभमेळयाचे काम आहे असे सांगून आयुक्तांना जबाबदारी झटकता येणार नाही.
















