पुणे : प्रतिनिधी
आगामी १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीत कोणताही राजकीय हस्तक्षेप असणार नाही. याबाबत अखिल भारतीय साहित्य महामंडळ जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. आगामी १०० वे साहित्य संमेलन हे केवळ इव्हेंट होणार नाही तर मराठी भाषा, परंपरा आणि संस्कृती याचे जतन आणि विस्तार करणारे असेल असे त्यांनी सांगितले.
मराठी भाषा मंत्री सामंत यांची महाराष्ट्र साहित्य महामंडळाच्या पदाधिका-यांबरोबर चर्चा झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवी दिल्ली आणि सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनासाठी शासनाने ३ कोटींचा निधी दिला होता मात्र १०० व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे त्यातील एक कोटीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे.मात्र पुढील वर्षापासून होर्णाया संमेलनासाठी २ कोटीचा निधी दिला जाणार आहे. १०० व्या संमेलनाच्या अगोदर विविध ठिकाणी ९९ संमेलन आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी ५ कोटींचा निधी दिला जाणार आहे त्याचप्रमाणे परदेशातील १२ देशांत होणा-या संमेलनांसाठी २ कोटी आणि युवा साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यातील एकूण १३ विद्यापीठांत संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे याखेरीज १०० व्या साहित्य संमेलनात मराठी भाषा विभागाच्या स्वतंत्र दालनासाठी ५० लाख निधी देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
येत्या ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘माझी मराठी… अभिजात मराठी ’ हा उपक्रम राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये राबविण्यात येणार आहे असे नमूद करून ते म्हणाले, मराठी साहित्य पुढे नेण्यासाठी आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यासाठी विविध उपक्रम राज्याच्या विविध भागात राबविण्यात येणार आहेत त्याचा हा एक भाग असणार आहे याबरोबर ग्रामीण भागातील साहित्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. बोली भाषा पुढील पिढीपर्यंत पोचावी आणि भाषेचा अधिक व्यापक प्रमाणावर विस्तार व्हावा हा त्यामागचा उद्देश असणार आहे तसेच नव्याने मराठी भाषा अनुवाद समिती तयार करण्यात येणार आहे त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.
पुण्यातील १०० व्या संमेलनापूर्वी आयोजन करण्यात येणा-या ९९ व्या साहित्य संमेलनाचा प्रारंभ येत्या १४ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. यामध्ये विविध घटकांसाठी संमेलन होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
















