नवी दिल्ली : दिल्लीच्या अबकारी कर धोरणातील कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने रचलेले हे कट-कारस्थान असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
पण आता काँग्रेस नेते राहुल गांधी हे केजरीवाल यांच्या मदतीला धावून गेले आहेत, त्यांना कायदेशीर मदत करणार आहेत. केजरीवालांच्या कुटुंबियांशी फोनवरुन संवाद साधत त्यांनी धीर देण्याचे काम केले आहे.
केजरीवालांच्या अटकेनंतर राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, घाबरलेला हुकुमशहा एक मेलेली लोकशाही तयार करतो. मीडियासह सर्व संस्थांवर कब्जा, राजकीय पक्षांची तोडफोड, कंपन्यांकडून हप्ता वसुली, प्रमुख विरोधीपक्षांची खाती गोठवणे देखील आसुरी शक्तीसोबत हा हुकुमशाहा काम करत होता.
आता तर निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक होणे ही सर्वसाधारण बाब बनली आहे. इंडिया आघाडी याला सडेतोड उत्तर देईल अशा आक्रमक शब्दांत राहुल गांधींनी नाव न घेता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, ईडीने नववे समन्स पाठवूनही केजरीवाल यांनी त्याची दखल घेतली नाही. तर आपल्याला पाठवलेली सर्व समन्स ही बेकायदा असल्याचे सांगत तसेच अटकेची जाणीव असल्याने त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर लगेचच ईडीने दहावे समन्स घेऊन केजरीवाल यांच्या घरी धाव घेतली आणि दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली.