बीड : निवडणुकीच्या वेळी माझी जात काढली जाते, हे दुर्दैव असल्याचे मत भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही. आंदोलना चांगली दिशा देण्यासाठी ताकतवर नेतृत्वाची गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदीच बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच मोठे शक्तिप्रदर्शन करत पंकजा मुंडे यांनी रॅली देखील काढली.
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या आधी त्यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे या मतदार संघाच्या खासदार आहेत. मात्र, प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापत पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. गेल्या पाच वर्षापासून पंकजा मुंडे राजकारणातून बाजूला पडल्या होत्या. मात्र, आता त्यांनी पुन्हा एकदा राजकारणात जोरदार प्रवेश केला आहे.
बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा लढत
बीड लोकसभा मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर पंकजा मुंडे यांनी मत व्यक्त केले. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आंदोलनाचा परिणाम होणार नाही. आंदोलनाला दिशा देण्यासाठी ताकतवर नेतृत्वाची गरज असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. दररोज माझी जात काढली जात असेल तर हे दुर्दैवी असल्याचे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या वतीने बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे यांना उमेदवारी देण्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.