लखनौ : देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर ७ मे रोजी तिस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामुळे सत्ताधारी भाजपसह देशभरातील विरोधीपक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचारात व्यस्थ आहेत. अशातच जनसत्ता दलाचे अध्यक्ष आमदार राजा भैया यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बंगळुरू मध्ये भेट घेतली आहे. या भेटीवरून अनेक अर्थ काढले जात असले तरी राजा भैय्या यांच्या अमित शहा यांच्या भेटीनंतर भाजपला उत्तर प्रदेशमध्ये (यूपी)मोठा फायदा होणार आहे, असे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कौशांबी लोकसभा मतदारसंघा संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राजा भैया यांनी आता कौशांबी मतदारसंघातील भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. भाजपने कौशांबीचे खासदार विनोद सोनकर यांना पुन्हा तिकीट दिल्याने राजा भैय्या नाराज होते, कारण सोनकर यांनी अनेक प्रसंगी त्यांना उघडपणे विरोध केला होता.मात्र, बदललेल्या परिस्थितीत झालेल्या या बैठकीत राजा भैय्या यांनी अमित शहा यांना आता भाजपचे उमेदवार विनोद सोनकर यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
जनसत्ता दलाचे अध्यक्ष राजा भैय्या यांनी यापूर्वीच भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता, मात्र कौशांबी मतदारसंघाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती . मात्र, अमित शहा यांच्या भेटीनंतर आता राजा भैय्या यांनी कौशांबीमधील भाजपचे उमेदवार विनोद सोनकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे.