अयोध्या : राम मंदिरातील दान चोरी प्रकरणात मोठे उलटफेर होताना पाहायला मिळत आहे. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये मोठ्या उलथापालथी होत आहेत. अनेक पदांचा खांदेपालट करण्यात येत आहेत. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी राम मंदिर ट्रस्ट संरक्षक (पालक) पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक महत्त्वाचा दुवा म्हणून भय्याजी जोशी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राम मंदिर ट्रस्टने किंवा भय्याजी जोशी यांनी या प्रकरणी कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. भय्याजी जोशी यांनी दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च नेतृत्वात काम केले आहे. राम मंदिर ट्रस्टच्या नवीन रचनेत आणि नवीन कार्यशैलीत नवीन चेह-यांना प्राधान्य दिले जात आहे. अनेक जुनी माणसे आता सक्रियपणे सहभागी नाहीत. या चर्चांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी या बदलाबाबत संघटनात्मक आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानले जाणारे भय्याजी जोशी यांनी राम मंदिर ट्रस्टच्या पालक पदाचा राजीनामा दिला आहे. ट्रस्टने त्यांना या जबाबदारीतून मुक्त केले आहे. भय्याजी जोशी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिल्याचे अधिकृतपणे म्हटले जात आहे. भय्याजी जोशी यांचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कारण एकेकाळी आरएसएस आणि भाजपा यांच्यातील सर्वांत मजबूत दुवा मानले जात होते. जोशी यांची संघटनेवर दीर्घकाळ मजबूत पकड होती. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये जोशी यांचा सहभाग असे. राम मंदिर ट्रस्टच्या पदाचा राजीनामा देणे हा केवळ एक औपचारिक बदल नसून, संघटनात्मक दृष्टिकोनातूनही तो महत्त्वाचा मानला जात आहे.
पालक हे प्रशासकीय पद
श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टमधील पालक हे पद प्रशासकीय आणि संघटनात्मक समन्वयाशी संबंधित मानले जाते. या जबाबदारीमध्ये ट्रस्टच्या कार्यावर देखरेख ठेवणे, वेळोवेळी मार्गदर्शन करणे यांचा समावेश होतो. हे पद दैनंदिन प्रशासकीय कामापेक्षा वेगळे मानले जाते. संघटनात्मक स्तरावर ट्रस्टचे कामकाज अधिक बळकट करण्याच्या पार्श्वभूमीवर जोशी यांच्याकडे संरक्षक (पालक) म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. परंतु आता या पदाचा राजीनामा दिला आहे.
















