नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील संघर्षात चार वर्षांनंतरही कोणताही बदल झालेला नाही. सीमेवरील परिस्थिती दिवसेंदिवस संवेदनशील होत चालली आहे. भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, वास्तविक नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर पण संवेदनशील आहे. ते म्हणाले की चीनच्या सीमेवर भारतीय सैन्य आणि इतर घटकांची तैनाती अत्यंत मजबूत आणि संतुलित आहे. एका कॉन्क्लेव्हमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ते म्हणाले, पायाभूत सुविधा आणि सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत सीमेवर काय घडामोडी घडतायत यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असेही जनरल मनोज पांडे म्हणाले.
पँगॉन्ग लेक परिसरात झालेल्या हिंसक चकमकीनंतर ५ मे २०२० रोजी पूर्व लडाख सीमेवर कोंडी झाली होती. जून २०२० मध्ये गलवान व्हॅली चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध लक्षणीयरीत्या बिघडले होते. दोन्ही बाजूंमधील अनेक दशकांतील हा सर्वात गंभीर लष्करी संघर्ष होता. एलएसीवरील सद्यस्थितीबाबत जनरल पांडे म्हणाले, आत्ताची परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशील आहे. ते म्हणाले की, एलएसी आणि इतर घटकांवर सैन्याच्या सध्याच्या तैनातीच्या संदर्भात मी थेट म्हणेन की आमची तैनाती अत्यंत मजबूत आणि संतुलित आहे. संपूर्ण एलएसीवर उद्भवू शकणा-या कोणत्याही संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आम्ही लष्करी पायाभूत सुविधा आणि तोफखाना यांचा पुरेसा साठा असेल याची खबरदारी घेतली आहे.
एलएसीवर बारकाईने लक्ष
इंडिया अँड द इंडो-पॅसिफिक: थ्रेट्स अँड चॅलेंजेस या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना जनरल मनोज पांडे म्हणाले की एलएसीवर बारकाईने लक्ष ठेवताना, पायाभूत सुविधा आणि सैन्याच्या हालचालींच्या बाबतीत इतर काय घडामोडी घडतात हे देखील पाहणे गरजेचे आहे. या प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील तयारी यामुळे एलएसीवरील वाढता तणाव या प्रश्नाला उत्तर देताना लष्करप्रमुख बोलत होते.