28.6 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषसरकार स्थापन झाले; पण...

सरकार स्थापन झाले; पण…

पाकिस्तानमध्ये अलीकडेच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे अखेरीस तेथे कडबोळ्यांचे अस्थिर सरकार प्रस्थापित झाले आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाझचे वरिष्ठ नेते असणा-या शाहबाज शरीफ यांनी नुकतीच पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून त्यांनी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि एमक्यूएमसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले आहे. शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या काळात ते पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. परंतु त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करून सत्ता स्थापन केली होती. आताही पश्चिम युरोपियन देशांना आणि जगाला दाखवण्यासाठीच पाकिस्तानात हे शासन स्थापन करण्यात आले आहे. या शासनाला पाकिस्तानातील जनसामान्यांची अधिमान्यता नाही. राजकीय परिभाषेत ज्याला अनैसर्गिक युती असे म्हटले जाते तशा स्वरूपाची युती करून शाहबाज शरीफ पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत. परस्परांविरुद्ध निवडणुका लढवून, एकमेकांवर यथेच्छ टीका करून निकालांनंतर सत्तेची फळे चाखण्यासाठी जनतेने दिलेल्या मतांचा अनादर करत हे पक्ष एकत्र आले आहेत आणि त्यांनी पाकिस्तानात लोकशाही आहे हा संदेश जगाला देण्यासाठी सरकार स्थापन केले आहे. बेनझिर भुत्तोंचे पती असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

मुळात पाकिस्तानात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुका याच जगाला काही संदेश देण्यासाठी घेण्यात आल्या. पाकिस्तानातील लोकशाही ही लष्करकेंद्रित किंवा लष्करनियंत्रित आहे. पाकिस्तानातील जनतेने भलेही आपल्याला मिळालेल्या मतदानाचा हक्क बजावत विविध पक्षांच्या विचारसरणीनुसार आणि ध्येयधोरणांनुसार त्या पक्षातील उमेदवारांची निवड केलेली असली तरी तेथे पंतप्रधान कोण होणार ही बाब पाकिस्तानचे लष्करच ठरवत असते. त्यामुळे लष्कराची मर्जी असेपर्यंतच सदर राजकीय नेता पंतप्रधानपदावर राहू शकतो. लष्कराची वक्रदृष्टी पडल्यास किंवा लष्कराला आव्हान दिले गेल्यास अशा पंतप्रधानाला पायउतार करण्यात येते, असे इतिहासात दिसून आले आहे. त्यामुळेच भारताबरोबरीने स्वतंत्र झालेल्या या देशामध्ये गेल्या ७५ वर्षांमध्ये एकही सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पाकिस्तानी लष्कराने सर्व गोष्टी नियंत्रित केल्या असूनही आणि पडद्यामागून सर्व नेपथ्यरचना केलेली असूनही लष्कर पुरस्कृत पीएमएल-एन या पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही. निवडणुकीच्या काळातही अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्यामुळे पाकिस्तानात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न उपस्थित करणा-या ठरल्या. या सर्वांनंतर प्रस्थापित झालेल्या शाहबाज शरीफ यांच्या शासनाला आता येणा-या भविष्यकाळात आपले अस्तित्व टिकवण्याचे सर्वांत मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. हे सरकार किती काळ सत्तेत राहील याबाबत आजघडीला कोणतीही हमी देता येत नाही.

याचे प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानी जनतेच्या मनातील इम्रान खान यांना पुन्हा सत्तेत बसवण्याबाबतच्या भावना स्पष्टपणाने दिसून आल्या होत्या. इम्रान खान तुरुंगात असल्याने त्यांच्या पक्षाचे सर्व सदस्य अपक्ष उमेदवार म्हणून जरी लढले असले तरी ९० जागांवर त्यांना जनतेने विजय मिळवून दिला आहे. माध्यमांमधून अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत की, पाकिस्तानात मतमोजणीदरम्यान काही गैरप्रकार घडले. अनेक जाणकारांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकार घडले नसते तर इम्रान खान यांच्या पक्षाच्या उमेदवारांची संख्या बहुमतापर्यंत सहज पोहोचली असती. त्यामुळे येणा-या काळात शाहबाज शरीफ सरकारपुढे सतत अस्थिरतेचे सावट असणार आहे. कदाचित इम्रान खान तुरुंगातून बाहेर पडले तर ते एखाद-दुस-या पक्षाशी हातमिळवणी करून शरीफ सरकारची खुर्ची खेचून घेऊ शकतात.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, नवनिर्वाचित शरीफ सरकारपुढे असणा-या आर्थिक आव्हानांचा मेरुपर्वत ! येथील जनता महागाई, बेरोजगारी, अन्नधान्य टंचाई यांसह असंख्य नागरी समस्यांचा मुकाबला करून अक्षरश: मेटाकुटीला आली आहे. भिकेकंगाल झालेल्या या देशामध्ये अंड्यांचे भाव ४०० रुपयांवर पोहोचले आहेत. कांद्याचा भाव २३० ते २५० रुपये प्रतिकिलो झाला आहे, एक किलो चिकन ६१५ रुपयांना मिळत आहे. दूध २१३ रुपये प्रतिलिटर, तर तांदूळ ३२८ रुपये किलोने विकला जात आहे. एक किलो सफरचंदाचा भाव २७३ रुपयांवर पोहोचला आहे, तर टोमॅटो २०० रुपये किलोने विकला जात आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२३ पर्यंत त्यांची एकूण कर्जे आणि दायित्वे २७.२ टक्क्यांनी वाढून ८१.२ ट्रिलियन रुपये झाली आहेत. गेल्या वर्षभरात देशाच्या कर्जात १७.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत हा आकडा ६३.८३ लाख कोटी रुपये होता. पाकिस्तानची परकीय गंगाजळी जेमतेम १० अब्ज डॉलर्स इतकी खालावली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे पेट्रोल-डिझेलची आयात करण्यासाठीही पुरेसा पैसा उपलब्ध नाही. परिणामी पाकिस्तान सातत्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्याकडे बेलआऊट पॅकेजची मागणी करत आला आहे.

शाहबाज शरीफ यांचे सरकार प्रस्थापित झाल्यानंतर ते स्थिर स्वरूपाचे आहे असे लक्षात आले तर आयएमएफने मंजूर केलेल्या बेलआऊट पॅकेजपैकी २ अब्ज डॉलर्सचा पहिला मदतहप्ता मिळणार आहे. किंबहुना, हे पॅकेज मिळवण्यासाठी सत्तास्थापनेचे नाट्य रचण्यात आले आहे, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही. या सरकारपुढे आणखी एक मोठे आव्हान आहे ते तालिबानचे. वास्तविक, अफगाणिस्तानातील तालिबानचे शासन हे पाकिस्तानातील आयएसएसआय आणि लष्कराने पुरस्कृत केलेले आहे. पण आज याच तालिबानने पाकिस्तानची डोकेदुखी वाढवली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान जी ड्युरंड लाईन आहे त्याला मान्य करण्यास तालिबान तयार नाही. या दोन्ही देशांना विभागणारी ही सीमारेषा ब्रिटिशकालीन असल्याने ती आम्हाला मान्य नसल्याचे सांगत तालिबानने स्वतंत्र पख्तुनीस्तान निर्माण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

आता प्रश्न उरतो तो पाकिस्तानातील या नव्या सरकारमुळे भारत-पाक संबंधांवर काय परिणाम होईल? वास्तविक, मोदी सरकारने पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत एक स्पष्ट चौकट आखून ठेवलेली आहे. त्यानुसार टेरर, टॉक आणि ट्रेड या तिन्ही गोष्टी एकाच वेळी चालणार नाहीत. म्हणजेच टेरर किंवा दहशतवादी कारवाया थांबल्याशिवाय टॉक म्हणजेच चर्चा आणि व्यापार होणार नाही, अशी लक्ष्मणरेषाच मोदी सरकारने आखून दिलेली आहे. त्यानुसार मागील काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरच भारताने पाकिस्तानशी चर्चा आणि व्यापार हा पूर्णपणे बंद केलेला आहे. तरीही पाकिस्तानातील नवे सरकार भारताबरोबर पंगा घेण्याचा प्रयत्न करेल का किंवा सीमेवरील कारवाया वाढतील का असा प्रश्न उपस्थित केला जातो. परंतु तशा शक्यता खूप कमी आहेत. याचे कारण शरीफ सरकार हे अंतर्गत समस्यांच्या दलदलीतच इतके अडकून गेले आहे की त्यांना भारताविरुद्ध संघर्षाचा मार्ग अवलंबण्याची क्षमताच त्यांच्याकडे उरलेली नाही.

-डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR