नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची घोषणा केली.
भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा तयार केला होता, त्यामध्ये सीएए लागू करणे हा महत्वाचा अजेंडा होता. दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे विविध स्तरातुन जोरदार टीका करण्यात येत आहे. तर आता दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार दलपती विजयने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, २०१९ लागू केल्यानंतर तमिळ अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम पक्षाचे (टीव्हिके) प्रमुख थलापथी विजय यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. अभिनेत्याने नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा अस्वीकार्य असल्याचे म्हटले आणि तामिळनाडू सरकारला राज्यात त्याची अंमलबजावणी करू नये अशी विनंती केली आहे.