दीर्घकाळापासून आजारी असलेले ज्येष्ठ व ख्यातनाम शायर बशीर बद्र यांनी भोपाळ येथे वयाच्या ९१ व्या वर्षी गुरूवारी अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या ‘एक्झिट’ने देश-विदेशातील रसिक चाहत्यांमधून एकच प्रतिक्रिया उमटली ती म्हणजे त्यांच्या जाण्याने मानवतेचा चेहरा हरपला! ही प्रतिक्रिया वा भावना उत्स्फूर्त होती कारण बशीर बद्र यांनी आपल्या शायरीतून आयुष्यभर मानवतेचा संदेश अत्यंत सहज सोप्या भाषेत प्रत्येकाच्या मनात उतरवत माणुसकीची भाषा दृढ केली. खरं तर त्यांना स्वत:ला माणुसकीला काळीमा फासणा-या घटनेला सामोरे जावे लागले होते. १९८७ च्या मेरठ दंगलीत बशीर बद्र यांचे घर, ग्रंथसंपदा, अप्रकाशित कविता समाजकंटकांच्या उच्छादात जळून खाक झाल्या मात्र तरीही त्यांचा माणुसकीवरील विश्वास हरवला नाही. त्यानंतर त्यांनी भोपाळमध्ये स्थायिक होत नव्याने आयुष्याला सुरुवात केली आणि अत्यंत शांतपणे आपल्या वेदनांना वाट करून देत उपद्रव करणा-यांनाही मानवतेचा संदेश देताना म्हटले-
लोग टूट जाते है एक घर बनाने में,
तुम तरस नही खाते बस्तियाँ जलाने में…
बद्र यांना मागच्या अनेक वर्षांपासून स्मृतीभ्रंश विकाराने ग्रासले होते. अखेर भोपाळच्या राहत्या घरी ‘उजाले अपनी यादों के रहने दे हजारे साथ, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए’ अशी साद घालणारा हा शायर संध्याछायेत विलीन झाला. पद्मश्री पुरस्कारप्राप्त बशीर बद्र यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास सुरू झाल्यावर त्यांचा सार्वजनिक वावर कमी होत गेला. कदाचित त्यांनी स्वत:च जाणीवपूर्वक तसा निर्णय घेतला असावा.
कुछ तो मजबुरियाँ रही होगी,
यूँ ही कोई बेवफा नही होता।
अशी उत्कट समंजसता व्यक्त करणारा हा शायर आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांच्यावर प्रेम करणा-यांनाच ओळखेनासा झाला. आपली स्मृती आता साथ देत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी गेल्या १० वर्षांपासून मुशाय-यांना जाणे बंद केले होते. बशीर बद्र हे त्यांच्या पिढीतील सर्वांत लोकप्रिय कवींपैकी एक कवी. त्यातही बशीर बद्र सामान्यातील सामान्यांच्या मनात घर करून राहिले कारण त्यांनी केवळ गझल लिहिली नाही तर गझलेला सामान्य माणसाची भाषा बनवली. बशीर बद्र यांनी मोठ्यात मोठी गोष्ट इतक्या साधेपणाने व सहज सोप्या भाषेत सांगितली की, थेट लोकांच्या हृदयाला भिडली, त्यांच्या मनात घर करून गेली. त्यांच्या शायरीत कोणताही बनावटपणा नव्हता, चमत्कार दाखविण्याचा, गूढ उलगडण्याचा अविर्भाव नव्हता तरी त्यांचा प्रत्येक शेर स्वत: एक चमत्कार बनून जायचा. बशीर बद्र यांच्या शायरीने संसदेपासून रस्त्यांपर्यंत सर्व काही सहज व्यापून टाकले. त्यांचे अनेक शेर घोषणा बनल्या, जगण्याची, व्यवहाराची भाषा बनले. ‘दिल मिले या ना मिले, हाथ मिलाते रहिए’ हा त्यांचा शेर भारत-पाकिस्तान संबंधांची भाषा बनला. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी हस्तांदोलन केल्याचे फोटो वृत्तपत्रात छापून यायचे तेव्हा त्या फोटोंच्या खाली दिल्या जाणा-या फोटो ओळींमध्ये या शेरचा समावेश हमखास असायचा.
‘दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हो’
हा शेर बशीर बद्र यांनी १९७२ च्या भारत-पाकिस्तान शिमला कराराच्या काळात लिहिला होता. त्याची त्या वेळी तर जोरदार चर्चा झालीच; पण जागतिक राजकारणातील द्विराष्ट्रीय संबंधांवर जेव्हा जेव्हा चर्चा व्हायची तेव्हा तेव्हा या शेरचा उल्लेख आवर्जून व्हायचा इतका तो कालातीत व चपखल ठरला. आज देशातील द्वेषपूर्ण वातावरण वाढीला लागले असताना बशीर बद्र यांचे सहज, सोप्या भाषेतले पण मार्मिक भाष्य करत माणुसकीचा संदेश देणारे शेर हमखास सामन्यांच्या ओठी येतात. बशीर बद्र यांची कविता राजकीय बंडखोरीच्या अंगानेच जाणारी; पण सौम्य व अलगदपणे भावना व्यक्त करणारी त्यामुळे त्यांच्या शायरीस एक नजाकत प्राप्त झालेली पहायला मिळते.
इक सवारी आएगी, इक जाएगी,
बारी बारी सबकी बारी आएगी
असं लिहून जीवनाचं तत्त्वज्ञान अत्यंत सहज व तरलतेने सांगणा-या बशीर बद्र यांची सवारीही गुरूवारी मर्त्य लोकातून रवाना झाली. अशा या माणुसकीची भाषा व मानवतेचा चेहरा असलेल्या बशीर बद्र यांचा जन्म कानपूरमध्ये झाला आणि बालपण अयोध्येत गेले. उर्दूबरोबरच हिंदी, पार्शियन आणि इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभूत्व होते. सातवी इयत्तेत असताना ‘निगार’ या तत्कालिन नियतकालिकात त्यांची पहिली गझल छापून आली होती. त्यांच्या ‘आस’ या काव्यसंग्रहामध्ये ६९ गझलांचा समावेश होता. या ६९ गझला बद्र यांच्या सर्वोत्तम गझला मानल्या जातात. या काव्यसंग्रहाला १९९९ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या निवडक कवितांचा ‘कुल्लियाते बशीर बद्र’ हा संग्रह पाकिस्तानात प्रकाशित झाला होता. बद्र यांचे उर्दूमध्ये सातपेक्षा अधिक काव्यसंग्रह प्रकाशित झाले. १९९९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. साहित्य अकादमीसह अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव झाला. त्यांना उत्तर प्रदेश उर्दू अकादमीचा सन्मान ४ वेळा मिळाला होता. बिहार उर्दू अकादमी, मीर अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांची सर्वांत मोठी उपलब्धी म्हणजे उर्दू गझल त्यांनी देवनागरी लिपीत आणण्याचे काम त्यांनी केले. ‘उजाले अपनी यादों के’ हा त्यांचा संग्रह विशेष गाजला. उर्दू शायरीनिमित्ताने त्यांनी जगभर भ्रमंती केली व जगभर त्यांचे चाहते निर्माण झाले. बशीर बद्र यांच्या निधनाने उर्दू साहित्यविश्वातील एक हळवा, संवेदनशील आणि माणुसकीची भाषा बोलणारा एक मानवतेचा चेहराच हरपला आहे मात्र त्यांच्या शायरीतील संदेश कायम रसिकांच्या स्मरणात ‘उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो…’ असे सांगत कायम स्मरणात राहणार आहेत. अखेर बशीर साहेबांच्या शब्दांत-
‘मुसाफिर है हम भी मुसाफिर हो तुम भी,
किस मोड पर फिर मुलाकात होगी’,
असं सांगत त्यांची शायरी पदोपदी आपल्याला भेटत राहणारच आहे.
















