सांगली : अनेकांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न करूनही विशाल पाटील आपल्या निर्णयावर ठाम राहिले. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली असून भाजपाकडून संजयकाका पाटील रिंगणात आहेत. तर अपक्ष म्हणून विशाल पाटील निवडणूक लढवणार आहेत. यातच सांगलीतील बंडखोरी पक्षाच्या हाताबाहेरील होती, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, काही बंडखो-या या पक्षाच्या हातात राहत नाही. त्याला काही इलाज नाही. आता ही निवडणूक जशा पद्धतीने आहे तशा पद्धतीने होणार सांगलीतील बंडखोरी ही आमच्या हाताबाहेर असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. भाजपचे नेते या निवडणुकीदरम्यान खालच्या पातळीवरती टीका करत आहेत. मंगळसूत्रापर्यंत टीका करणे पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला शोभत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा तोल जात आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
ही लढाई जनतेची, अस्तित्वाची, स्वाभीमानाची आहे. माझ्या उमेदवारीला अनेक अडथळे आणायचा प्रयत्न. कोणत्याही आमिषाला बळी न पडता अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाचा विचाराचा उमेदवार आहे. मी स्वार्थ पाहिला नाही. जनतेकडे आम्ही स्वाभिमानाने जाऊ शकतो. मला चिन्ह मिळू नये, माझे बॅलेट मशिनवर नाव सर्वांत खाली यावे, असेही प्रयत्न झाले. हे सगळे कोण करतय याचा लवकर खुलासा करू असे विशाल पाटील यांनी म्हटले होते.