धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात यंदा दुष्काळी परिस्थीती असल्याने चो-यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरटे घरफोडी करीत आहेत. जिल्ह्यातील प्रवाशांची गर्दी असलेल्या बसस्थानका प्रवाशांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली जात आहे. कळंब बसस्थानकात बसमध्ये चढत असलेल्या बार्शी येथील महिलेचे साडेआठ तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरीची ही घटना दि. २१ एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी कळंब पोलिस ठाणे येथे दि. २२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपळाई रोड बार्शी येथे राहणा-या स्वाती दत्तात्रय कोकाटे (वय ३०) ह्या दि. २१ एप्रिल रोजी कळंब येथे कामानिमित्त आल्या होत्या. त्या काम संपल्यानंतर बसस्थानक कळंब येथे लातूरला जाण्यासाठी लातूर जाणा-या बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्र्दीचा फायदा घेऊन स्वाती कोकाटे यांच्या पर्सर्ची चैन उघडून पर्समधील ८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी स्वाती कोकाटे यांनी दि. २२ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.