मुंबई : अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करत आहोत. मी माझ्या अर्थसंकल्पाच्या भाषणामध्येच एल निनोच्या संदर्भात वाच्यता केली होती. त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केल्या जात असलेल्या उपाययोजनांबद्दलही मुख्यमंत्री बोलले.
मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामे कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात करता येतील, हाही आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणे कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाचे छोटे साठेच कामी येतात. त्यामुळे त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
चारा टंचाई टाळण्यासाठी कृषी विभागाला सूचना
प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन ही जलसंधारणाची कामे कशी पूर्ण करायची, हे आपण सांगितले आहे. चा-याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यादृष्टीने आपण पशुसंवर्धन विभाग आणि कृषि विभाग यांना सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
…पण त्यातून मार्ग काढू
ही गोष्ट खरी आहे की, ज्या पद्धतीचे अंदाज दिले जात आहेत, त्यात अडचण मोठी असेल; पाऊस कमी पडणार आहे. त्यातून आपण मार्ग काढू. विशेषत: शेतक-यांना आम्ही सल्ला देत आहोत. राज्य सरकारकडून दिल्या जाणा-या मार्गदर्शनानुसारच जर शेतक-यांनी पेरणी केली, तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली, तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील. दुबार पेरणीची वेळ येईल असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांना केले आहे.
















