नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महामार्गांवरून प्रवास करायचा म्हणजे टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगांची कटकट. फास्टॅगमुळे हा प्रवास वेगवान झाला असला तरी अनेकवेळा तांत्रिक बिघाड किंवा पेमेंट फेल झाल्यामुळे वाहनांना पुन्हा थांबावे लागते आणि प्रवासात वेळ वाया जातो. पण नितीन गडकरींच्या नव्या मास्टरप्लॅनमुळे ही रोजची चिंता मिटणार आहे. २०२६ अखेरपर्यंत देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझा हटवणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
सध्या सुरू असलेल्या टोल नाक्यांऐवजी एका आधुनिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे. यामुळे टोल नाक्यावर न थांबताच प्रवासी आधीपेक्षा वेगवान प्रवास करू शकतात. या नव्या सिस्टिमअंतर्गत, वाहनांनी प्रत्यक्ष पार केलेल्या अंतरानुसारच त्यांच्याकडून टोल आकारला जाणार आहे. टाइम्स ग्रुपच्या ‘टाइम्स ड्राईव्ह ऑटो समिट अँड अवॉर्डस् २०२६’या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यावेळी नितीन गडकरींनी ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन टेक्नॉलॉजी अँड फास्टॅग’वर आधारित प्रणालीबद्दल माहिती दिली. या नवीन प्रणालीची सध्या चाचणी सुरू आहे. देशभरातील ८५ टोलनाक्यांवर यापूर्वीच ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
प्रवासी आता ठराविक टोल भरण्याऐवजी ‘पे-पर-यूज’प्रमाणे टोल भरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रणालीबद्दल बोलताना सांगितले की, २०२६ च्या अखेरपर्यंत भारतात टोल नाके राहणारच नाहीत. टोल भरण्याची चिंता न करता ताशी ८० किमी वेगाने वाहनचालक प्रवास करू शकतात. हाय-टेक कॅमेरे आणि जीपीएस-आधारित ट्रॅकिंगचा वापर करून वाहनांची ओळख पटणार आहे. त्यानंतर वाहनांशी थेट लिंक केलेल्या खात्यांमधून टोलची रक्कम वजा होईल.
टोल नाक्यावरील वाचलेल्या वेळामुळे इंधनाची बचत होणार आहे. तसेच, टोलचे पैसेही वाचणार आहेत. फास्टॅगच्या यशानंतर देशभरात ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. फास्टॅगची अंमलबजावणी झाली त्यानंतरही काही तांत्रिक त्रुटी निर्माण होत होत्या. त्यामुळे प्रत्यक्ष बूथ आवश्यक होते. पण गर्दीच्या वेळी त्यामुळे प्रवासात अडथळे निर्माण होत होते. २०२६ च्या डिसेंबरपर्यंत हे तंत्रज्ञान फुलप्रूफ आहे याची खात्री पटण्यासाठी सरकारने चाचण्या सुरू केल्या आहेत.
या प्रणालीमध्ये फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन तंत्रज्ञान वापरले जाते. आरएफआयडी वाचक आपले फास्टॅग स्टिकर स्कॅन करतात. त्याच वेळी, एआय-पावर्ड कॅमेरे एएनपीआर वापरून आपल्या वाहनाची नंबर प्लेट वाचतात. ही ड्युअल-व्हेरिफिकेशन सिस्टम त्रुटी टाळण्यास मदत करते. जरी तुमचा फास्टॅग काम करत नसला तरीही तुमची नंबर प्लेट टोल टॅक्ससाठी वापरली जाऊ शकते. लिंक केलेल्या खात्यातून ही रक्कम वजा केली जाईल.
अधिक कठोर नियम
या नव्या प्रणालीमुळे टोलचे नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत. जर एखाद्या वाहनचालकाच्या खात्यातून रक्कम वजा झाली नाही तर मालकाला ई-नोटीस पाठवली जाते. जर फास्टॅग पाळला गेला नाही तर फास्टॅग निलंबित केला जाऊ शकतो. दंड श्अऌअठ डेटाबेसशी देखील जोडला जाऊ शकतो. कॅश लेन नसल्याने प्रत्येकाला या यंत्रणेचे पालन करावे लागेल.

