“विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवू देणार नाही”; शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात हजारो शेतकऱ्यांचा एल्गार, अमित देशमुखांचा सरकारवर हल्लाबोल

पंढरपूर : राज्यात प्रस्तावित असलेल्या नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला रविवारी पंढरपुरात मोठे स्वरूप प्राप्त झाले. शक्तीपीठ महामार्गविरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सद्बुद्धी दिंडी पायी यात्रा’ आणि भव्य जनआंदोलनात राज्यातील १३ जिल्ह्यांतील हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनात माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भर पावसात उपस्थित राहत शेतकऱ्यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बोलताना अमित देशमुख यांनी सरकारवर जोरदार टीका करत, “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे अस्तित्व संपवू देणार नाही. शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असा इशारा दिला.

मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलन
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर येत असतानाच शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाखरी पालखी तळ येथून सद्बुद्धी दिंडी यात्रेला प्रारंभ झाला. भर पावसातही हजारो शेतकरी हातात फलक, घोषणाबाजी आणि आंदोलनाची निशाणी घेऊन रस्त्यावर उतरले. वाखरी येथून सुरू झालेली ही दिंडी सह्याद्रीनगर, जुना कराड नाका, प्रबोधनकार ठाकरे चौक, स्टेशन रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचली. मंदिरात विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करत आंदोलकांनी राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याची आणि हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना केली.

“शक्तीपीठ नव्हे, सक्तीपीठ महामार्ग”
यानंतर इसबावी येथील संतराज पॅलेस हॉलमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना आमदार अमित देशमुख यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, “कोणत्याही नागरिकाने किंवा शेतकऱ्यांनी मागणी न केलेला हा महामार्ग सरकार जबरदस्तीने लादत आहे. हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा, सुपीक शेती उद्ध्वस्त करणारा आणि राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा हा प्रकल्प आहे. हा शक्तीपीठ महामार्ग नसून ‘सक्तीपीठ महामार्ग’ ठरत आहे. त्यामुळे तो तात्काळ रद्द करावा.” शेतकऱ्यांनी उभारलेल्या या आंदोलनात आपण शेवटपर्यंत खंबीरपणे सहभागी राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती
या मेळाव्यात माजी मंत्री जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज (बंटी) पाटील, महादेव जानकर यांनीही सरकारच्या कथित शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. त्यांनी विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेणारे प्रकल्प राबविण्याऐवजी पर्यायी मार्गांचा विचार करण्याची मागणी केली. यावेळी आमदार अभिजित पाटील, कैलास पाटील, उमेशराजे निंबाळकर, विजय देशमुख, अॅड. समद पटेल, शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे पदाधिकारी तसेच राज्यभरातून आलेले हजारो शेतकरी उपस्थित होते.

१३ जिल्ह्यांतील ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणामाची भीती
आंदोलकांच्या मते, प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर सुपीक शेती, शेतकऱ्यांची घरे, विहिरी, फळबागा आणि शेतीपूरक पायाभूत सुविधा बाधित होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल आणि हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा
शेतकरी नेत्यांनी सरकारने महामार्गाचा प्रस्ताव मागे घेतला नाही, तर राज्यभरात अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला. “विकासाला आमचा विरोध नाही; मात्र शेतकऱ्यांचे अस्तित्व, शेती आणि ग्रामीण संस्कृती उद्ध्वस्त करणारा कोणताही प्रकल्प आम्ही स्वीकारणार नाही,” असा निर्धार सर्वपक्षीय नेत्यांनी आणि शेतकरी संघटनांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, आगामी काळात या प्रकल्पावरून सरकार आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news