सेलू : अडचणीच्या काळातही आनंदाने जीवन जगायचे सामर्थ्य ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीतील स्त्रियांच्या जीवन जाणीवेतून आणि त्यांच्या संघर्षपूर्ण व्यक्तिमत्त्वातून मांडल्याचे प्रा. डॉ. सखाराम कदम यांनी अधोरेखित केले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलूच्या वतीने दि. २३ रोजी आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमातील ४२वे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रय माकोडे होते. यावेळी कादंबरीवर बा. बा .कोटंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. डॉ. कदम म्हणाले की, ऊन सावलीच्या शोधात या कादंबरीत १९७२च्या दुष्काळी परिस्थितीचे स्तिमित करणारे चित्रण कादंबरीकार कोटंबे यांनी मांडले आहे. जगण्याला उभारी देण्याची क्षमता स्त्रियांमध्ये आहे. त्या कितीही मोठ्या संकटाला न डगमगता धैर्याने उभे राहून नेटाने संसार करतात.
या कार्यक्रमांत ग्रंथालयाचे वाचक केंद्र प्रमुख दत्तात्रय यादव, कृष्णा शिंदे विजय तुरकर, धनंजय ठोंबरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक दिलीप डासाळकर यांनी केले. सूत्रसंचालन विजय आवटे यांनी तर आभार प्रदर्शन अमोल बिडवे यांनी केले. कार्यक्रमास माणिक पुरी, हनुमान व्हरगुळे, महेश खारकर, डॉ.शरद कुलकर्णी, संजय विटेकर, महेशराव खारकर, ईश्वर घोडके, विवेक सोन्नेकर, प्रा.संभाजी रोडगे, प्रा.जय बोराडे, अशोक कांबळे, पूरुषोतम कुलकर्णी, जयश्री सोन्नेकर, भाग्यश्री किर्तनकार, संध्या फुलपगार, अनया ढाकणे, आर्या ढाकणे, राम गायकवाड, रामराव बोबडे आदिंची उपस्थिती होती. वाचन लेखन चळवळ वृध्दिंगत व्हावी या उद्देशाने शहरातील शारदा विद्यालय व के.बा.विद्यालय यांना ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ भेट दिली.
















